Friday, February 26, 2016

वॅली ऑफ फ्लॉवर्स : ९ : माहिती आणि समाप्त

वॅली ऑफ फ्लॉवर्सची आमची ट्रिप खूपच छान आणि संस्मरणीय झाली. त्याबद्दल तुम्ही या मालिकेत वाचलंच आहे. आता त्या संदर्भात तिकडे जाऊ इच्छिणाऱ्या लोकांना उपयोगी पडेल अशी माहिती देत आहे.



मार्ग/टप्पे :

-१. दिल्ली पर्यंत : आम्ही पुणे आणि मुंबईचे लोक मिळून गेलो होतो. तिथून दिल्लीला विमानाने पोचलो आणि एकत्र आलो.
०. दिल्ली ते हरिद्वार हा प्रवास ट्रेनने केला. दिल्ली ते देहरादून मार्गावर हरिद्वार येते आणि यासाठी कमी अधिक वेगाच्या अनेक ट्रेन आहेत. आम्ही देहरादून जनशताब्दी एक्स्प्रेसने गेलो. ४-५ तासात आम्ही हरिद्वारला पोहोचलो. हरिद्वारपासून आमचे वॅली ऑफ फ्लॉवर्सचे टूर कंपनीचे पॅकेज सुरु झाले.
मुक्काम : हरिद्वार
१. ट्रीपमधला पहिला दिवस हरिद्वार ते गोविंदघाट या प्रवासासाठी होता. साधारण ३०० किमीच्या या डोंगराळ प्रवासाला १०-१२ तास लागतात. आणि दरड कोसळली तर कितीही वेळ खोळंबा होऊ शकतो.
मुक्काम : गोविंदघाट
२. दुसरा दिवस : गोविंदघाट ते घांगरीया पायी जाण्यासाठी. १४ किमीचे अंतर आहे. ८-१० तास लागतात. आपल्या क्षमता आणि वेगानुसार वेळ कमीजास्त होऊ शकतो. इथुन पुढे चार दिवस घांगरीयामधेच राहिलो. वॅली ऑफ फ्लॉवर्स, आणि हेमकुंड या दोन्हीच्या पायथ्याशी हे गाव आहे, आणि दोन्ही ठिकाणी राहण्याची सोय नसल्यामुळे याच गावी राहावे लागते.
मुक्काम : घांगरीया
३. तिसरा दिवस : वॅली ऑफ फ्लॉवर्समध्ये पहिली वारी. घांगरीयापासून ६ किमीपर्यंत फिरून आलो. जाऊन येउन १२ किमी.
मुक्काम : घांगरीया
४. चौथा दिवस : वॅली ऑफ फ्लॉवर्समध्ये दुसरी वारी. घांगरीयापासून १० किमीपर्यंत वॅली ऑफ फ्लॉवर्समध्ये फिरून आलो. जाऊन येउन २० किमी. हा दिवस राखीव दिवस आहे. हि ट्रीप मुख्यतः वॅली ऑफ फ्लॉवर्ससाठी आहे, तिचा मनमुराद आनंद घेता यावा आणि पहिल्या दिवशी काही समस्या आली, किंवा गोविंदघाटला पोहचायलाच उशीर झाला तर हा दिवस कामी येतो. काही लोक एकदाच फिरून या दिवशी आराम करणेसुद्धा पसंत करतात.
मुक्काम : घांगरीया
५. पाचवा दिवस : हेमकुंड साहिब गुरुद्वाराला जाण्यासाठी. घांगरीयापासून ६ किमी अंतर असले तरी सलग चढण चढत जायला बराच वेळ लागतो. आणि विकीपेडियावरील माहितीनुसार तेथे जाताना बऱ्याच जणांना उंचीचा त्रासहि होतो. मलासुद्धा त्या दिवशी उन लागल्यामुळे खूप त्रास झाला होता. वर लंगरमध्ये प्रसादाचे जेवण मिळते.
मुक्काम : घांगरीया
६. सहावा दिवस : घांगरीया ते गोविंदघाट पायी परत. उतार असल्यामुळे येतानापेक्षा निम्म्या वेळात प्रवास होतो. याच दिवशी वेळ उरल्यास बद्रीनाथ आणि मानाला भेट देता येते.
मुक्काम : गोविंदघाट
७. सातवा दिवस : गोविंदघाट ते हरिद्वार परतीचा प्रवास. पुन्हा तेवढाच वेळ. आम्ही मध्ये थांबून लक्ष्मण झुला पाहून घेतला. हरिद्वारला जाऊन रात्री दिल्लीसाठी मसुरी एक्स्प्रेस पकडली. हि जनशताब्दीपेक्षा संथ जाते. आम्ही मुद्दाम हि निवडली कारण त्यामुळे आमची रात्रभर झोप झाली आणि आम्ही सकाळी दिल्लीला पोहोचलो. दिल्लीहून विमानाने मुंबई/पुणे परत.

टूर कंपनी : 

  • आम्ही ब्लू पॉपीज हॉलिडेज या कंपनीकडून गेलो होतो. 
  • त्याचे व्यवस्थापक देवकांत संगवान स्वतः आमच्या सोबत वॅली ऑफ फ्लॉवर्समध्ये आले होते. 
  • त्यांचे पॅकेज हरिद्वार ते हरिद्वार आहे. त्यातल्या गोष्टी याप्रमाणे
    • हरिद्वारला पहिल्या दिवशीचा मुक्काम 
    • हरिद्वार ते गोविंदघाटला जाण्यासाठी सदस्यांच्या संख्येप्रमाणे गाडी. 
    • हीच गाडी तुम्हाला हरिद्वारला परत सोडते. 
    • गोविंदघाटचा मुक्काम (त्यांनी स्वतः चालवायला घेतलेले चांगले हॉटेल आहे )
    • घांगरीयामध्ये ४ रात्रींचा मुक्काम 
    • घांगरीयामध्ये असेपर्यंत सर्व जेवणे (न्याहारी, दुपारच्या जेवणाचे पार्सल सोबत घेऊन जाण्यासाठी, रात्रीचे जेवण)
    • वॅली ऑफ फ्लॉवर्समध्ये जाताना सोबत गाईड 
  • शुल्क : १५-१८ हजार. मुद्दाम अंदाज देत आहे. ग्रुपमधली सदस्यांची संख्या, जातानाची वेळ, किती आधी आरक्षण केले आहे, आणि किती घासाघीस केली आहे यानुसार शुल्क कमीजास्त होईल. 
  • त्यात पुन्हा या वर्षी त्यांनी वॅली ऑफ फ्लॉवर्समधला ज्यादा दिवस वगळण्याचा, आणि सोबत औली पाहून येणाचा पर्याय उपलब्ध केला आहे. त्यामुळे शुल्क वेगळे असेल. 
  • मला त्यांची सेवा चांगली वाटली. ते ठिकाण दुर्गम आहे. राहण्याखाण्याची चांगली सोय झाल्यामुळे आपल्याला जास्त काही बघावे लागत नाही. 
  • आणि त्यांच्या म्हणण्यानुसार वॅली ऑफ फ्लॉवर्समधला ज्यादा दिवस आणि जास्त खोलात जाऊन फिरणे हे फक्त तेच करून आणतात. तुम्ही प्लान करताना याची खात्री करून मग जाऊ शकता. 
  • त्यांची वेब साईट : http://www.valleyofflowers.info/ 
  • यावर खूप सविस्तर आणि चांगल्या प्रकारे माहिती दिली आहे. 
  • देवकांत संगवान यांनी स्वतः काढलेल्या फुलांच्या आणि पक्ष्यांच्या छायाचित्रांचे संकलन करून एक फोटो बुक दिले आहे. यात सुंदर फोटोज आणि उपयुक्त माहिती आहे. 
  • काही कंपन्या तंबूमध्येसुद्धा व्यवस्था करून देतात, त्याचा खर्च बराच कमी असू शकतो. पण तंबू लावलेल्या जागेपर्यंत जाण्यायेण्यामुळे अंतर वाढू शकते.
इतर खर्च : 
  • वर दिल्याप्रमाणे घांगरीयामध्ये आपला मुख्य मुक्काम असतो, तिथली जेवणे मुख्य शुल्कात असल्यामुळे आपल्याला फक्त घरून तिथे पोहचेपर्यंत, आणि तिथून घरी जाईपर्यंतचा खाण्याचा खर्च करावा लागतो. 
  • हरिद्वारला जाणे आणि येणे हा खर्च आपला असतो. 
  • याखेरीज आपण काही खरेदी केली तर. 
    • खरेदी करण्यासारखे काही विशेष नाही. पण गरम कपडे, टोप्या, ट्रेकिंगचे साहित्य अशा गोष्टी सोबत आणल्या नसतील तर इथे घेऊ शकता. 

कधी जावे : 
यात काही फार पर्याय उपलब्ध नाहीत. हिवाळ्यात या ठिकाणी बर्फ जमतो, तो उन्हाळ्यात वितळायला सुरुवात होते. इथे फक्त पावसाळ्यात जाता येते. प्रत्येक फुलाचा स्वतःचा हंगाम असतो. हे बर्फ लवकर किंवा उशिरा वितळण्यावर अवलंबून आहे. जुलैच्या दुसऱ्या भागात आणि ऑगस्टच्या पहिल्या भागात हा सर्वाधिक फुले असण्याचा काळ. जुलै हाच जास्त चांगला म्हणतात. पण आम्ही जुलैमध्ये गेलो, तरी यावर्षी बर्फ उशिरा वितळल्यामुळे फुले उशिरा आली. म्हणून मी ऑगस्टचा पहिला भागसुद्धा म्हणतोय.

घांगरीयामधल्या सोयीसुविधा :

  • घांगरीया या गावात फक्त पावसाळ्यात हंगामी वस्ती असते. त्यामुळे येथे मर्यादित हॉटेल्स आहेत. 
  • ट्रेकिंगसाठी लागणाऱ्या सर्व गोष्टी येथे मिळतात. पण किंचित जास्त भावाने. 
  • सर्वाधिक महाग टेलिफोन आहे. एका मिनिटाचे १० रुपये घेतात. 
  • इथे फक्त बीएसएनएल आणि आयडिया चालते असे आम्हाला सांगितले होते. पण आमच्यापैकी ज्यांनी मुद्दाम हे फोन नंबर आणले होते त्यांचेसुद्धा इथे काही चालले नाहीत. 
  • बहुधा फक्त उत्तराखंड सर्कलचे चालत असावेत. 
  • गोविंदघाटला पोचल्यानंतर फोन बंद पडतात. त्या आधी मात्र सर्वांचे चालू होते. 
  • त्यामुळे येथे येताना रोमिंग सुविधेची खात्री करून या. 
  • बाकी आम्ही थांबलेले प्रिया हॉटेल राहण्यासाठी ठीक ठाक होते, येथली सर्व हॉटेल्स तशीच आहेत. 
  • सेवा मात्र तत्पर होती. 
  • जेवण सर्व ठिकाणी उत्तम होते. 
काय बदलू शकता?

  • वेळ असल्यास पुणे/मुंबई ते दिल्लीपर्यंतचा (आणि परतीचा) हाच प्रवास ट्रेनने सुद्धा होऊ शकतो. त्यात एका वेळेस एक दिवस अख्खा जातो. पण भाडे कमी लागते. काही महिने आधीपासून बेत आखल्यास विमानाचे तिकीटसुद्धा स्वस्तात मिळू शकते. 
  • बद्रीनाथ आणि माना आमच्या प्लानमध्ये घांगरीयाहून गोविंदघाटला लवकर पोचता आले तरच शक्य आहे. आणि दुपारी ३-४ नंतर कधीही रस्ते बंद होतात. तिकडे जाण्याची जोरदार इच्छा असेल तर मुक्काम वाढवून त्यासाठी एक दिवस राखीव ठेवू शकता. 
  • हरिद्वार आणि आसपासची तीर्थक्षेत्रे पाहण्यासाठी जास्त वेळ देऊ शकता. 
तयारी 
  • ट्रीपसाठी वर दिलेल्या साईटवर सविस्तर माहिती आहे. 
  • त्याखेरीज मला जाणवलेल्या गोष्टी 
    • तुमच्याकडे अगोदरच असल्यास ट्रेकिंग स्टिक सोबत बाळगा 
    • किंवा गोविंद घाट हून जाताना ३०-४० रुपयात लाकडी स्टिक मिळेल ती घ्या. 
    • हिचा चढताना फार उपयोग होतो. 
    • चालण्याचा रोजचा सराव नसेल तर काही आठवडे आधी नक्की सराव करा आणि आपली क्षमता वाढवा. 
    • सवय नसेल तर इथे अचानक एवढे किमी चालून त्रास होऊ शकतो, आणि तुम्ही आनंदास मुकु शकता. 
अजुन काही माहिती हवी असल्यास मला विचारा. हिमालय आयुष्यात किमान एकदा तरी पहावाच. आमची ट्रीप एकदम जोरदार झाली. आयुष्यभर लक्षात राहील. तुम्ही गेलात तर तुमचीसुद्धा तशीच होवो अशी आशा करतो. 

No comments:

Post a Comment