Friday, February 26, 2016

वॅली ऑफ फ्लॉवर्स : ९ : माहिती आणि समाप्त

वॅली ऑफ फ्लॉवर्सची आमची ट्रिप खूपच छान आणि संस्मरणीय झाली. त्याबद्दल तुम्ही या मालिकेत वाचलंच आहे. आता त्या संदर्भात तिकडे जाऊ इच्छिणाऱ्या लोकांना उपयोगी पडेल अशी माहिती देत आहे.



मार्ग/टप्पे :

-१. दिल्ली पर्यंत : आम्ही पुणे आणि मुंबईचे लोक मिळून गेलो होतो. तिथून दिल्लीला विमानाने पोचलो आणि एकत्र आलो.
०. दिल्ली ते हरिद्वार हा प्रवास ट्रेनने केला. दिल्ली ते देहरादून मार्गावर हरिद्वार येते आणि यासाठी कमी अधिक वेगाच्या अनेक ट्रेन आहेत. आम्ही देहरादून जनशताब्दी एक्स्प्रेसने गेलो. ४-५ तासात आम्ही हरिद्वारला पोहोचलो. हरिद्वारपासून आमचे वॅली ऑफ फ्लॉवर्सचे टूर कंपनीचे पॅकेज सुरु झाले.
मुक्काम : हरिद्वार
१. ट्रीपमधला पहिला दिवस हरिद्वार ते गोविंदघाट या प्रवासासाठी होता. साधारण ३०० किमीच्या या डोंगराळ प्रवासाला १०-१२ तास लागतात. आणि दरड कोसळली तर कितीही वेळ खोळंबा होऊ शकतो.
मुक्काम : गोविंदघाट
२. दुसरा दिवस : गोविंदघाट ते घांगरीया पायी जाण्यासाठी. १४ किमीचे अंतर आहे. ८-१० तास लागतात. आपल्या क्षमता आणि वेगानुसार वेळ कमीजास्त होऊ शकतो. इथुन पुढे चार दिवस घांगरीयामधेच राहिलो. वॅली ऑफ फ्लॉवर्स, आणि हेमकुंड या दोन्हीच्या पायथ्याशी हे गाव आहे, आणि दोन्ही ठिकाणी राहण्याची सोय नसल्यामुळे याच गावी राहावे लागते.
मुक्काम : घांगरीया
३. तिसरा दिवस : वॅली ऑफ फ्लॉवर्समध्ये पहिली वारी. घांगरीयापासून ६ किमीपर्यंत फिरून आलो. जाऊन येउन १२ किमी.
मुक्काम : घांगरीया
४. चौथा दिवस : वॅली ऑफ फ्लॉवर्समध्ये दुसरी वारी. घांगरीयापासून १० किमीपर्यंत वॅली ऑफ फ्लॉवर्समध्ये फिरून आलो. जाऊन येउन २० किमी. हा दिवस राखीव दिवस आहे. हि ट्रीप मुख्यतः वॅली ऑफ फ्लॉवर्ससाठी आहे, तिचा मनमुराद आनंद घेता यावा आणि पहिल्या दिवशी काही समस्या आली, किंवा गोविंदघाटला पोहचायलाच उशीर झाला तर हा दिवस कामी येतो. काही लोक एकदाच फिरून या दिवशी आराम करणेसुद्धा पसंत करतात.
मुक्काम : घांगरीया
५. पाचवा दिवस : हेमकुंड साहिब गुरुद्वाराला जाण्यासाठी. घांगरीयापासून ६ किमी अंतर असले तरी सलग चढण चढत जायला बराच वेळ लागतो. आणि विकीपेडियावरील माहितीनुसार तेथे जाताना बऱ्याच जणांना उंचीचा त्रासहि होतो. मलासुद्धा त्या दिवशी उन लागल्यामुळे खूप त्रास झाला होता. वर लंगरमध्ये प्रसादाचे जेवण मिळते.
मुक्काम : घांगरीया
६. सहावा दिवस : घांगरीया ते गोविंदघाट पायी परत. उतार असल्यामुळे येतानापेक्षा निम्म्या वेळात प्रवास होतो. याच दिवशी वेळ उरल्यास बद्रीनाथ आणि मानाला भेट देता येते.
मुक्काम : गोविंदघाट
७. सातवा दिवस : गोविंदघाट ते हरिद्वार परतीचा प्रवास. पुन्हा तेवढाच वेळ. आम्ही मध्ये थांबून लक्ष्मण झुला पाहून घेतला. हरिद्वारला जाऊन रात्री दिल्लीसाठी मसुरी एक्स्प्रेस पकडली. हि जनशताब्दीपेक्षा संथ जाते. आम्ही मुद्दाम हि निवडली कारण त्यामुळे आमची रात्रभर झोप झाली आणि आम्ही सकाळी दिल्लीला पोहोचलो. दिल्लीहून विमानाने मुंबई/पुणे परत.

टूर कंपनी : 

  • आम्ही ब्लू पॉपीज हॉलिडेज या कंपनीकडून गेलो होतो. 
  • त्याचे व्यवस्थापक देवकांत संगवान स्वतः आमच्या सोबत वॅली ऑफ फ्लॉवर्समध्ये आले होते. 
  • त्यांचे पॅकेज हरिद्वार ते हरिद्वार आहे. त्यातल्या गोष्टी याप्रमाणे
    • हरिद्वारला पहिल्या दिवशीचा मुक्काम 
    • हरिद्वार ते गोविंदघाटला जाण्यासाठी सदस्यांच्या संख्येप्रमाणे गाडी. 
    • हीच गाडी तुम्हाला हरिद्वारला परत सोडते. 
    • गोविंदघाटचा मुक्काम (त्यांनी स्वतः चालवायला घेतलेले चांगले हॉटेल आहे )
    • घांगरीयामध्ये ४ रात्रींचा मुक्काम 
    • घांगरीयामध्ये असेपर्यंत सर्व जेवणे (न्याहारी, दुपारच्या जेवणाचे पार्सल सोबत घेऊन जाण्यासाठी, रात्रीचे जेवण)
    • वॅली ऑफ फ्लॉवर्समध्ये जाताना सोबत गाईड 
  • शुल्क : १५-१८ हजार. मुद्दाम अंदाज देत आहे. ग्रुपमधली सदस्यांची संख्या, जातानाची वेळ, किती आधी आरक्षण केले आहे, आणि किती घासाघीस केली आहे यानुसार शुल्क कमीजास्त होईल. 
  • त्यात पुन्हा या वर्षी त्यांनी वॅली ऑफ फ्लॉवर्समधला ज्यादा दिवस वगळण्याचा, आणि सोबत औली पाहून येणाचा पर्याय उपलब्ध केला आहे. त्यामुळे शुल्क वेगळे असेल. 
  • मला त्यांची सेवा चांगली वाटली. ते ठिकाण दुर्गम आहे. राहण्याखाण्याची चांगली सोय झाल्यामुळे आपल्याला जास्त काही बघावे लागत नाही. 
  • आणि त्यांच्या म्हणण्यानुसार वॅली ऑफ फ्लॉवर्समधला ज्यादा दिवस आणि जास्त खोलात जाऊन फिरणे हे फक्त तेच करून आणतात. तुम्ही प्लान करताना याची खात्री करून मग जाऊ शकता. 
  • त्यांची वेब साईट : http://www.valleyofflowers.info/ 
  • यावर खूप सविस्तर आणि चांगल्या प्रकारे माहिती दिली आहे. 
  • देवकांत संगवान यांनी स्वतः काढलेल्या फुलांच्या आणि पक्ष्यांच्या छायाचित्रांचे संकलन करून एक फोटो बुक दिले आहे. यात सुंदर फोटोज आणि उपयुक्त माहिती आहे. 
  • काही कंपन्या तंबूमध्येसुद्धा व्यवस्था करून देतात, त्याचा खर्च बराच कमी असू शकतो. पण तंबू लावलेल्या जागेपर्यंत जाण्यायेण्यामुळे अंतर वाढू शकते.
इतर खर्च : 
  • वर दिल्याप्रमाणे घांगरीयामध्ये आपला मुख्य मुक्काम असतो, तिथली जेवणे मुख्य शुल्कात असल्यामुळे आपल्याला फक्त घरून तिथे पोहचेपर्यंत, आणि तिथून घरी जाईपर्यंतचा खाण्याचा खर्च करावा लागतो. 
  • हरिद्वारला जाणे आणि येणे हा खर्च आपला असतो. 
  • याखेरीज आपण काही खरेदी केली तर. 
    • खरेदी करण्यासारखे काही विशेष नाही. पण गरम कपडे, टोप्या, ट्रेकिंगचे साहित्य अशा गोष्टी सोबत आणल्या नसतील तर इथे घेऊ शकता. 

कधी जावे : 
यात काही फार पर्याय उपलब्ध नाहीत. हिवाळ्यात या ठिकाणी बर्फ जमतो, तो उन्हाळ्यात वितळायला सुरुवात होते. इथे फक्त पावसाळ्यात जाता येते. प्रत्येक फुलाचा स्वतःचा हंगाम असतो. हे बर्फ लवकर किंवा उशिरा वितळण्यावर अवलंबून आहे. जुलैच्या दुसऱ्या भागात आणि ऑगस्टच्या पहिल्या भागात हा सर्वाधिक फुले असण्याचा काळ. जुलै हाच जास्त चांगला म्हणतात. पण आम्ही जुलैमध्ये गेलो, तरी यावर्षी बर्फ उशिरा वितळल्यामुळे फुले उशिरा आली. म्हणून मी ऑगस्टचा पहिला भागसुद्धा म्हणतोय.

घांगरीयामधल्या सोयीसुविधा :

  • घांगरीया या गावात फक्त पावसाळ्यात हंगामी वस्ती असते. त्यामुळे येथे मर्यादित हॉटेल्स आहेत. 
  • ट्रेकिंगसाठी लागणाऱ्या सर्व गोष्टी येथे मिळतात. पण किंचित जास्त भावाने. 
  • सर्वाधिक महाग टेलिफोन आहे. एका मिनिटाचे १० रुपये घेतात. 
  • इथे फक्त बीएसएनएल आणि आयडिया चालते असे आम्हाला सांगितले होते. पण आमच्यापैकी ज्यांनी मुद्दाम हे फोन नंबर आणले होते त्यांचेसुद्धा इथे काही चालले नाहीत. 
  • बहुधा फक्त उत्तराखंड सर्कलचे चालत असावेत. 
  • गोविंदघाटला पोचल्यानंतर फोन बंद पडतात. त्या आधी मात्र सर्वांचे चालू होते. 
  • त्यामुळे येथे येताना रोमिंग सुविधेची खात्री करून या. 
  • बाकी आम्ही थांबलेले प्रिया हॉटेल राहण्यासाठी ठीक ठाक होते, येथली सर्व हॉटेल्स तशीच आहेत. 
  • सेवा मात्र तत्पर होती. 
  • जेवण सर्व ठिकाणी उत्तम होते. 
काय बदलू शकता?

  • वेळ असल्यास पुणे/मुंबई ते दिल्लीपर्यंतचा (आणि परतीचा) हाच प्रवास ट्रेनने सुद्धा होऊ शकतो. त्यात एका वेळेस एक दिवस अख्खा जातो. पण भाडे कमी लागते. काही महिने आधीपासून बेत आखल्यास विमानाचे तिकीटसुद्धा स्वस्तात मिळू शकते. 
  • बद्रीनाथ आणि माना आमच्या प्लानमध्ये घांगरीयाहून गोविंदघाटला लवकर पोचता आले तरच शक्य आहे. आणि दुपारी ३-४ नंतर कधीही रस्ते बंद होतात. तिकडे जाण्याची जोरदार इच्छा असेल तर मुक्काम वाढवून त्यासाठी एक दिवस राखीव ठेवू शकता. 
  • हरिद्वार आणि आसपासची तीर्थक्षेत्रे पाहण्यासाठी जास्त वेळ देऊ शकता. 
तयारी 
  • ट्रीपसाठी वर दिलेल्या साईटवर सविस्तर माहिती आहे. 
  • त्याखेरीज मला जाणवलेल्या गोष्टी 
    • तुमच्याकडे अगोदरच असल्यास ट्रेकिंग स्टिक सोबत बाळगा 
    • किंवा गोविंद घाट हून जाताना ३०-४० रुपयात लाकडी स्टिक मिळेल ती घ्या. 
    • हिचा चढताना फार उपयोग होतो. 
    • चालण्याचा रोजचा सराव नसेल तर काही आठवडे आधी नक्की सराव करा आणि आपली क्षमता वाढवा. 
    • सवय नसेल तर इथे अचानक एवढे किमी चालून त्रास होऊ शकतो, आणि तुम्ही आनंदास मुकु शकता. 
अजुन काही माहिती हवी असल्यास मला विचारा. हिमालय आयुष्यात किमान एकदा तरी पहावाच. आमची ट्रीप एकदम जोरदार झाली. आयुष्यभर लक्षात राहील. तुम्ही गेलात तर तुमचीसुद्धा तशीच होवो अशी आशा करतो. 

Thursday, February 25, 2016

वॅली ऑफ फ्लॉवर्स : ८ : बद्रीनाथ आणि हरिद्वार

मागच्या पोस्टमध्ये मी बद्रीनाथ आणि जवळचे भारतीय सीमेवरचे अंतिम गाव माना येथे जाऊन आल्याचे वर्णन केले आहे. पण बद्रीनाथला थोडा संतापजनक अनुभव आला, त्याबद्दल सविस्तर सांगायचं होतं. मागची पोस्ट हि प्रामुख्याने महाभारताच्या खुणांवर होती.


बद्रीनाथला आम्ही गेलो आणि अनपेक्षित रित्या अगदी सहज पटकन दर्शन झाले. प्रवेशद्वारावर मोठी घंटा आहे ती वाजवून आम्ही आत गेलो. गर्दी नसल्यासारखीच होती. एक साधूबाबा आम्ही न बोलावताच समोर आले. "इधर से जाओ, यहा से अंदर जाना है" अशा सूचना द्यायला लागले.


आत गेलो, आतमध्ये अगदी बारीक चार पाच मुर्त्या होत्या. त्यांच्याभोवती दागिने, फुले, हार यांची इतकी रेलचेल होती कि त्यातली कोणती मूर्ती कोणाची हेच कळत नव्हते. त्यामुळेच एक गुरुजी माइक घेऊन बसले होते. त्यांची कमेंटरी चालू होती. "आपके दाये बाजू ये है, बीच मे ये है. वगैरे."

मला मंदिरात दान दिलेले आवडत नाही. (त्याबद्दल सविस्तर येथे वाचा.) त्यामुळे बद्रीनाथाला काहीही न चढवता मी बाहेर आलो.

बाहेर ते मघाशीचे बाबा पुन्हा भेटले. मंदिरात चारी बाजूला आणखी लहानसहान मंदिरे आहेत. आम्ही प्रदक्षिणा मारत तिथे फिरतच होतो. हे आमच्या मागेमागे, "अब यहा, अब वहा" करत फिरत होते.

समोर आमचे काही मित्र एक दुसरे बाबा आसनावर बसले होते त्यांच्याभवती उभे होते. ते काहीतरी लक्ष देऊन ऐकत आहेत असं वाटलं. मला वाटलं चेहरा पाहून भविष्य वगैरे सांगत असतील म्हणून मला जरा कुतूहल वाटलं. मी तिथे गेलो. ते फक्त तोंडाला येईल तो आशीर्वाद देत होते, आणि टिळा लावत होते. आणि हि सेवा अर्थातच मोफत नव्हती. आम्ही पामर तो साधूचा आशीर्वाद समजून पुढे निघालो तेव्हा त्यांनी थाळी वाजवून दक्षिणा वसूल केली.

मंदिरात फिरून झाले आणि बाहेर निघालो कि हे मागे फिरणारे बाबा दक्षिणा मागायला लागले. जे कोणीही सांगायची आवश्यकता नाही, असली माहिती स्वतःहून भाविकांच्या मागे फिरून देऊन त्याची दक्षिणा त्यांना अपेक्षित होती. त्या आशीर्वादवाल्या बाबांकडे तरी मी स्वतःहून गेलो होतो, ह्या अनाहूत माणसाला काही देणे शक्यच नव्हते. मी त्यांना नकार दिला.

तेव्हा त्यांनी हात उंचावून शिव्याशाप द्यायला सुरु केले. "वाह रे भक्त. वापस मत आना यहा." मी त्यांच्याकडे दुर्लक्ष करून बाहेर गेलो.


देवकांत यांनी मानाहून येताना नीलकंठ शिखर दाखवले होते. आणि ते म्हणाले कि हे दिसायला पुण्य लागते. ते शिखर खूप कमी वेळा दिसते. बऱ्याचदा ढगांमध्ये गुडूप होते. ते आता पुन्हा दिसत होते. आम्ही त्याचे फोटो काढत होतो.


तोच अजून एक बाबा माझ्याजवळ आले. म्हणाले, "बेटा यात्रापर निकला हु, एक छाता या ऐसी कोई काम कि चीज दिलवा दो." येउन त्यांनी सरळ ऑर्डरच दिली. ५-१० रुपयात खुश होणारे भिक्षुक नव्हते ते.

मी त्यांना नकार दिला आणि किंचित दूर गेलो. बाकी जणांना पुन्हा मलाच असा बाबा येउन भेटला म्हणून जरा हसु आलं. तोपर्यंत या बाबांनीसुद्धा रागारागात बडबडायला सुरु केलं.

"कलयुग है बेटा, कलयुग!!! नारायण कि सेवा नाही करोगे, तो यहा आनेका क्या फायदा? दरिद्र नारायण जानते हो? यु हि तो बाड आती है. तुम जैसे लोग ले डूबोगे दुनिया को."

त्यांच्याकडेसुद्धा दुर्लक्ष करून आम्ही गावात, बाजारात थोडा फेरफटका मारला. फिरत फिरत गाडी लावली होती तिकडे गेलो.



तिथे एक सगळी चाके काढलेला टेम्पो उभा होता. देवकांत यांनी आम्हाला त्याबद्दल एक गमतीशीर गोष्ट सांगितली. खरी कि खोटी माहित नाही. त्या गाडीच्या मालकाने खोटा विमा अर्ज दाखल केला होता. गाडी व्यवस्थित असूनसुद्धा ती पुरात वाहून गेली असा अर्ज केला. विमा कंपनीने तो दावा खोटा असल्याचे सिद्ध केले आणि तो मालक तुरुंगात गेला. तेव्हापासून टेम्पो तिथेच पडून होता. मालक दूर तुरुंगात असल्यामुळे बाकी भामट्यांनी बिनधास्त तिची चाके लंपास करून टाकली.

बद्रीनाथहून आम्ही परत गोविंदघाटला गेलो. दुसऱ्या दिवशी सकाळी हरिद्वारला निघालो. आजचा दिवस फक्त या प्रवासासाठी होता. येताना आम्ही या भागात पोचलो तेव्हा अंधार झाला होता. त्यामुळे आम्हाला काहीच दिसले नव्हते. तेच सौंदर्य आता जाताना पाहत होतो. हिमालय सोडून तिथून निघण्याची इच्छा होत नव्हती.

गोविंदघाटवरून थोडं खाली जोशीमठच्या पुढेमागे आमचे मोबाईल पुन्हा सुरु झाले. आणि उत्तराखंड पोलिसकडून मेसेज यायला सुरुवात झाली. जाताना आम्हाला येताना लागली होती त्याहून मोठी दरड कोसळली होती. त्यामुळे भरपूर आधीपासून मार्ग वळवला होता. थोडाथोडा वेळ काही ठिकाणी वाहतूक खोळंबून राहत होती, पण तासंतास एका ठिकाणी थांबावं लागलं नाही.

गाडीत आमचा अंताक्षरीचा गेम रंगला होता. वाटेत थांबून लक्ष्मण झुला पाहिला.




संध्याकाळी हरिद्वारला पोचलो. तेव्हा रात्रीच्या ट्रेनला काही तासांचा वेळ शिल्लक होता. आम्ही फ्रेश होण्यासाठी आणि आराम करण्यासाठी दोन रूम घेतल्या. हॉटेलवाल्यांनी आमची अडवणूक करण्याचा प्रयत्न केला, होईल तितकी घासाघीस करून आम्ही रूम ताब्यात घेतल्या.

आमच्यापैकी काही जणांना घाटावरची आरती पाहण्याची खूप इच्छा होती. पण बाथरूम दोनच असल्यामुळे आवरायला वेळ लागला. इथे पोचल्यावर सगळे थकले होते. कोण नक्की येणार, थांबणार काही समजत नव्हते. फक्त काही मिनिटे शिल्लक होती. आणि वेळ पुढे सरकत होता. अरूप आणि अमित जास्त थांबण्यात अर्थ नाही असा विचार करून मी तोंड धुवेपर्यंत पुढे पळाले.

मी तसाच ओल्या तोंडाने हॉटेलच्या बाहेर पळत आलो. घाटापर्यंत मी पळत तर पोचू शकणार नव्हतो. म्हणून मी तडक समोर आली ती सायकल रिक्षा केली. तोच निखिलसुद्धा मागे पळत आला, आणि माझ्या सोबत बसला. ह्या पळापळी मुळे काहीजण थोडे नाराज झाले. त्यांना पण यायचे होते. :D.

आमची सायकलरिक्षा सवारी मजेदार झाली. हिंदी पिक्चरमध्ये उत्तर भारतातली शहरे, गल्ल्या, बोळी, बाजार, गर्दीतून फिरणारा कॅमेरा असं चित्रण असतं तसंच अगदी वातावरण होतं. दोन्ही बाजूला दुकाने, त्यांच्यासमोर रस्त्यावर आलेले वेगवेगळ्या गोष्टींचे ठेले, अमर्याद गर्दी, ती सगळी मुख्य रस्त्यावर फुटपाथ असल्यासारखी फिरत होती. त्यांच्यामधून वाहने नो एन्ट्रीमध्ये घुसल्या सारखी अंग चोरून वाट काढत दोन्ही बाजूने चालली होती. आमचा सायकल रिक्षावाला फुल ताकद लावून आम्हाला पुढे ओढून घेऊन जात होता. कोणाशीही आपली टक्कर होईल अशी भीती वाटतच होती तोच एका दुचाकीच्या खेटून जाण्यामुळे सायकल रिक्षा कलंडला, आणि मी खाली सांडलो.

"गिरे तो भी सर उप्पर" असे म्हणतात तसे आमचे "गिरे तो भी कॅमेरा उप्पर" असे आहे. मला त्याचीच काळजी होती. बारीक से खरचटले, पण बाकी काही नाही. पुन्हा रिक्षात बसलो आणि पुढे निघालो. घाटावर पोचलो तेव्हा आरती जस्ट म्हणजे अगदी जस्ट संपली होती. हुकलीच शेवटी.

अरूप आणि अमितसोबत अनुजासुद्धा पळत गेली होती हे तिथे गेल्यावरच समजले. ते तिघे खूप पळाले होते आणि घामाघूम झाले होते. त्यांनासुद्धा अगदी शेवटचे काही क्षण बघायला मिळाले होते, पण अगदी परिपूर्ण दृश्य दिसले नव्हते. गंगा नदीच्या घाटावर हजारो लोक आरती करताना खूप छान दृश्य असते, हे फक्त टीव्हीवर पाहिले होते, पण प्रत्यक्षात संधी हुकली होती.


मग थोडावेळ घाटावर फिरलो. हजारो लोक नदीत अंघोळी करत होते. पाण्यापेक्षा सोडलेले दिवे, साबणाचे फेस, निर्माल्य, माणसे यांचाच भरणा नदीत जास्त दिसत होता. काही लोक आरतीचे ताट घेऊन फिरत होते आणि दक्षिणा गोळा करत होते. ते मंदिराचे पुजारी आहेत का, त्यांनी कोणती पूजा केली, आरती खरोखर केली का, कि फक्त कापूर जाळून दक्षिणा गोळा करत होते काय माहित. एक ताट, दिवा, तेल आणि कापूर एवढ्या भांडवलावर आपणसुद्धा हेच करू शकतो.

झाडेझुडपे उगवल्यासारखी गंगा, भगीरथ, शंकर यांची मंदिरेसुद्धा भरपूर होती. एकेक मंदिराच्या चहुबाजूला ओटे करून आणखी मिनी मंदिरे बनवली होती. म्हणजे प्रदक्षिणा घालताना सुद्धा अजून ४ देव दिसणार, आणि त्यात लोकांना दक्षिणा घालावी वाटणार.


आणि जवळपास सर्व मंदिरांवर "असली और प्राचीन" असा बोर्ड लावला होता. प्राचीन ठीक आहे एक वेळ, पण असली मंदिर म्हणजे? देवांची पण पायरसी होते कि काय इथे? कुठल्या दुकानावर शोभतील असले बोर्ड होते ते. बरोबरच आहे म्हणा. इतक्या हजारो लाखो भोळ्याभाबड्या लोकांच्या श्रद्धेला सेवा पुरवणारी मोठी व्यावसायिक चेनच ती, त्याच्या सगळ्या शाखा. त्यात स्पर्धा, म्हणून आम्हीच असली आणि प्राचीन अशी जाहिरात.

नदीतले पाणी पाहता त्यात जायची इच्छा होत नव्हती. तरी आपली पण सुप्त श्रद्धा, आणि "हरिद्वार आए और गंगा नही नहाए" असं नको व्हायला म्हणुन दूर एका गर्दी नसलेल्या कोपऱ्यात थोडा पाण्याला स्पर्श करून आलो.

थोडी भूक लागली होती, येताना चाटची मोठी दुकाने पाहिली होती. चाट, पूजा साहित्य, कपडे, प्रवाशांना लागणाऱ्या गोष्टी या सगळ्याची बरीच दुकाने होती. आणि त्यातल्या काही दुकानांवरसुद्धा "प्राचीन और प्रसिद्ध" असे बोर्ड होते.

एका दुकानात खूप गर्दी होती म्हणून तिथली कचोरी खाल्ली. नाव मोठं लक्षण खोटं. बस एवढंच वर्णन पुरे. ती गर्दी लौकिकामुळे नसावीच, फक्त आलेले लोकच इतके होते कि प्रत्येक ठिकाणी गर्दीच होती.

अजून काही खाण्याची इच्छा राहिली नाही. तसेच परत गेलो. जेवायला एका हॉटेलवर गेलो. जेवण होता होता जोरदार पाउस सुरु झाला. आमची थोडी फजिती झाली. अगदी समोर पलीकडे असलेल्या स्टेशनवर आम्हाला सामान सुखरूप पोचवायला रिक्षा कराव्या लागल्या.

आम्ही स्टेशनवर पोचल्यावर अगदी थोडाच वेळ तो पाउस टिकला. फक्त आमची फजिती उडवायलाच आला होता.

रात्री उशिराची संथ गतीने जाणारी ट्रेन होती. माझी जागा जरा दुसरीकडे होती. जागेवर पोचून थोड्यावेळात मी झोपून गेलो. सकाळी दिल्लीला पोचलो.


स्टेशनबाहेर आम्ही एक सोबत ट्रीपमधला शेवटचा सेल्फी/ग्रूपी काढला आणि आम्ही पांगलो. प्रत्येकाचे वेगळ्या वेळी वेगळ्या ठिकाणी विमान होते.

मध्ये वेळ असल्यामुळे आम्ही ४ जण ममताच्या घरी जाऊन आलो. काकूंनी अगदी चविष्ट पुरी भाजी करून आम्हाला तृप्त केलं. विमानतळावर जाऊन परतीचं विमान पकडलं आणि एक जबरदस्त सहल संपली. 

Tuesday, February 9, 2016

वॅली ऑफ फ्लॉवर्स : ७ : महाभारताच्या खुणा

दोन दिवस वॅलीमध्ये आणि एक दिवस हेमकुंड साहिब, असे आमच्या योजनेनुसार पार पडल्यावर घांगरीयामधला मुक्काम संपला. सकाळी आम्ही आवरून परत गोविंदघाटकडे निघालो. आता फक्त उतरणे असल्यामुळे सगळेच न थांबता आपल्या आपल्या वेगाने फटाफट उतरले. चढताना ६-७ तास लागले होते. तेच आता उतरताना २-४ तासात झालं.

आजचा दिवस गोविंदघाटला पोहोचणे आणि वेळ असल्यास बद्रीनाथ, माना पाहून येणे आणि आसपास फिरणे यासाठी होता. आम्हाला साहजिकच सगळंच करायचं होतं. देवकांत यांना आम्ही पुन्हा पुन्हा आम्हाला हि ठिकाणे पहायची म्हणजे पहायचीच आहेत असे बजावले होते. कारण ह्याचा विषय निघाला कि ते "देखते है, आप कब पोहचोगे, रास्ते खुले है कि नही, बहोत सारी चीझोंपे डिपेंड करता है. सब कुछ सही होगा तो मै तो करा हि दुंगा." अशी वाक्ये वापरत होते.



त्यामुळे आम्ही उतरताना बिलकुल टंगळमंगळ न करता झपाट्याने खाली आलो. पण तरी आम्हाला थांबावं लागलं. 

झालं असं कि आम्ही वर जाताना सामानासाठी दोन पोनी केल्या होत्या. तश्याच त्या येताना सुद्धा ठरवल्या. पण त्या पोनीवाल्यांनी एक घोळ घातला. ते सगळे सोबत काम करतात, त्यामुळे एकमेकांना मदत करत सोबत खाली वर जातात. एका माणसाने त्याची बायको आणि छोटी मुलगी यांच्यासाठी एक पोनी केली, आणि त्यांच्या सामानासाठी दुसरी. तो स्वतः पायीपायी खाली आला. त्यांचं सामान कमी होतं. त्यामुळे त्यांच्या पोनीवर भार हलका होता. पोनी अर्धी रिकामीच जात आहे म्हणून या पोनीवाल्यांनी आमच्या सामानापैकी काही सामान त्यावर टाकलं. 

आणि ह्या पोनी पुढेमागे झाल्या. आमचं सामान एकत्र आलं नाही. म्हणून आम्हाला थांबावं लागलं. आणि मग जेव्हा त्या माणसाची पोनी आली आणि त्याने त्याच्या सामानासोबत दुसरं सामान पाहिलं तेव्हा त्याने पूर्ण पैसे द्यायला नकार दिला. त्याने वर एका पूर्ण पोनीचे पैसे द्यायला तयारी दाखवली होती. पण त्याच्या पोनीवर सामान टाकलं म्हणून त्याने आता नाही म्हटलं. 

यावरून बराच वेळ वाद झाला. आमचं सामान जाताना पण दोन पोनीवर गेलं होतं, आणि येताना पण आलं असतं. त्यांना भार हलका करता येईल असं वाटलं म्हणुन त्यांनी कोणाला न विचारता परस्पर करून टाकलं. आमचे गाईड मध्ये पडले आणि आम्ही तिथून निघालो. 

पण रस्त्यात दगडधोंडे रस्त्यात पडले होते. ते हटवायचं काम सुरु झालं होतं. तिथे थांबुन पुन्हा अर्धा एक तास गेला. 

हॉटेलवर पोहचून होईल तितकं लवकर आवरून आम्ही जेवलो. आणि बद्रीनाथला निघालो. देवकांत स्वतः आमच्या ग्रुपबरोबर निघाले. तिथे रस्ते परिस्थितीनुसार कधीही बंद करतात म्हणून ते टेन्शनमध्ये होते. 

आधी आम्ही बद्रीनाथला गेलो, पण तिथे आरती का काहीतरी चालू होती. त्यामुळे दर्शन बंद होतं. मग आम्ही तोपर्यंत पुढे मानाला जाऊन आलो.



माना हे भारताच्या हद्दीतलं शेवटचं गाव आहे. त्यानंतर तिबेट/चीनची हद्द सुरु होते. गावाच्या हद्दीवर काही दुकाने आहेत. त्यांनी हिंदुस्तानकि अंतिम दुकान, हिंदुस्तानकि अंतिम चाय, हिंदुस्तानका अंतिम पकोडा, असल्या मजेशीर पाट्या लावल्या होत्या.



पुढे काही अंतरावर प्रसिद्ध वसुधारा धबधबा आहे. लोक इथे पण ट्रेक करतात.



डोंगराच्या खोबणीत एक बाबा धुनी पेटवून बसला होता. पूर्ण चेहऱ्याला भस्म लावलं होतं. बाजूला "बाबा बर्फानी नागा बाबा. बाबा कोणाला काही मागत नाहीत, लोकांना स्वतःला काही द्यावे वाटल्यास देऊ शकतात." अशा आशयाची पाटी लावली होती.



बरेच लोक त्याचा फोटो काढत होते. बाबाला सवय असावी फोटोंची, मला त्याचा लक्ष नसताना फोटो काढायचा होता, पण त्याचं लक्ष गेलं आणि हात उंचावून पोज दिली. 

माना हे भारताच्या हद्दीतलं शेवटचं गाव एवढंच ऐकलं होतं. पण तिथे गेल्यावर महाभारताचं एक पर्वच सुरु झालं. त्या गावात महाभारताच्या भरपूर खुणा दिसतात. 

त्या अंतिम दुकानाजवळ एक मोठ्ठा धबधबा/सरस्वती नदीचा उगम आहे. अत्यंत जोराने मोठ्या आवाजात तिथून पाणी कोसळत असतं. (खालील व्हिडीओ पहा) तिथल्या सांगण्यानुसार हि सरस्वती नदी. ती उगमापासून एवढ्या जोराने वाहते, आणि पुढे काही अंतरावर अलकनंदा नदीमध्ये मिसळून जाते. पण अलकनंदा नदीचा प्रवाह शांतच राहतो, आणि ह्या जोराचा अथवा वेगाचा परिणाम दिसत नाही, म्हणून सरस्वती नदी लुप्त होते असं इथलं स्पष्टीकरण आहे.



सरस्वती नदीच्या असण्या-नसण्याविषयी, लुप्त होण्याविषयी, आणि जागेविषयी वेगवेगळे मतप्रवाह आहेत. त्यापैकी हा एक.



त्या धबधब्याच्या दोन्ही बाजूला जोडणारी एक मोठ्ठी शिळा आहे. तिला "भीम पूल" म्हणतात. त्याची कथा अशी कि, ती मोठी शिळा तिथे भीमानेच उचलून टाकली आणि पुढे जायला रस्ता केला. ह्याच रस्त्याने पांडव पुढे स्वर्गात गेले. 



त्याच गावात व्यास गुंफा आणि गणेश गुंफा आहे. तिथेच राहून त्यांनी महाभारताचे लेखन केले अशी आख्यायिका आहे. जायची प्रचंड इच्छा असूनही देवकांतनी आम्हाला तिथून धावत पळत बद्रीनाथला नेलं. 



बद्रीनाथचं अगदी सहज दर्शन झालं. पण तिथल्या बुवांचा वाईट अनुभव आला. पण त्याबद्दल पुढच्या पोस्ट मध्ये लिहितो. आज फक्त महाभारताविषयी.



मग परतीच्या रस्त्यावर लागलो, आणि धोकादायक भाग पार झाल्यावर शेवटी देवकांतचा जीव भांड्यात पडला.



परतीच्या वाटेत एक जागा आहे हनुमानकि चट्टी. याच जागी भीमाचा रस्ता अडवून हनुमानाने त्याचे गर्वहरण केले अशी पौराणिक कथा आहे.



हॉटेलवर पोहोचलो तेव्हा नुकतीच संध्याकाळ झाली होती. आम्ही पुन्हा आसपास फिरायला गेलो. देवकांत नि एक गाईड सोबत दिला. 

आम्ही पांडव मंदिरांकडे निघालो. रस्त्यात जाताना आधी एक इंद्रधनुष्य दिसले.



नंतर बोनस म्हणून आणखी एक पुसटसे.



पांडू राजाला नपुंसकतेचा शाप होता. त्याची पौराणिक कथा अशी कि एका ऋषीने पांडू राजाला तो आपल्या राणीजवळ कामेच्छेने जाताक्षणी मरण पावेल असा शाप दिला होता. वास्तववादी दृष्टीकोनातून महाभारत लिहिणारे लेखक हा भाग वेगळ्या पद्धतीने लिहितात. अपत्यहीन असलेला निराश राजा आपल्या दोन राण्यांना घेऊन हिमालयात आला. तो याच ठिकाणी राहत होता आणि तप करत होता. 

दोन्ही राण्यांना नियोग पद्धतीने देवांकडून (काहींच्या मते त्या काळी हिमालयात राहत असलेल्या योद्धा जमाती) संतती झाली. ते काही वर्षे तिथेच राहत होते. पण पांडू राजा माद्रीजवळ मोहाने गेला आणि मरून गेला. माद्री सती गेली. आणि एकटी पडलेली कुंती पाचहि मुलांना घेऊन पुन्हा हस्तिनापुरला गेली.



पुढे पांडव जेव्हा वनवासात फिरत असताना या ठिकाणी आले, तेव्हा भीमाने या ठिकाणी पांडू राजाच्या तपाच्या जागेवर मंदिर बांधले. तिथल्या पुजाऱ्यांनी आम्हाला अशा प्रकारे हि कथा सांगितली.

ह्या मंदिराचे आणखी महत्व म्हणजे बद्रीनाथ जेव्हा बंद केले जाते तेव्हा बद्रीनाथची पूजा याच देवळात केली जाते. 

मी वाचलेल्या महाभारताच्या पुस्तकांमध्ये या घटना आहेतच. पण त्या ह्या जागी घडल्या असे म्हटल्यावर सगळे महाभारत डोळ्यासमोरून सरकते. 

काहीजण रामायण महाभारत फक्त कल्पनाविलास मानतात. काहीजण इतिहास मानतात. तर काहीजण अतिरंजित वृत्तांत मानतात. मला तसेच वाटते. 

ह्या दोन्ही महाकाव्यांचा भारतीय समाजावर प्रचंड पगडा आहे. भारतभर अशा अनेक खुणा आहेत. आणि प्राचीन आहेत. शेकडो वर्षांपासून आहेत. द्वारका आहे, मथुरा आहे. मृत्युंजय आणि युगंधरच्या शेवटी बऱ्याच ठिकाणांचे फोटो आहेत. पाचगणीला पांडवांची पावले दाखवतात. दक्षिणेत कुठेतरी दुर्योधनाचेहि मंदिर आहे.

जर ह्याला फक्त साहित्य मानले, तर देशभरात वेगवेगळ्या वेळी, ठिकाणी लोक प्रभावित झाले आणि त्यांनी ह्या खुणा स्वतःच बनवल्या असे समजायचे?

इंग्लंडला शेरलॉक होम्सचे असे घर आणि संग्रहालय आहे. लोक त्या पात्राच्या एवढे प्रेमात पडले कि २२१ बेकर स्ट्रीटवर त्याचे घरच बांधले, त्याच्या प्रसिद्ध वस्तू आणुन ठेवल्या. आपल्याकडे हा उद्योग फार आधीपासुन चालू आहे म्हणायचा मग.

आता देऊळ सिनेमात दाखवलं आहे तसं गावाचं महत्व वाढण्यासाठी एक देऊळ त्याची महती कृत्रिम पद्धतीने वाढवून गावातली आवक जावक वाढवता येते. पण तसं इथे झालंय असं वाटत नाही. पण ह्या गोष्टी भारतात पर्यटन हा उद्योग नसल्यापासून केवळ श्रद्धेवर आधारलेल्या आहेत.

त्यामुळेच मला अतिशयोक्तीचा भाग किती हे सांगता येत नाही, पण ती पुटे बाजूला केली तर काही तरी सत्यांश ह्या कथांमध्ये दडला असावा असं वाटतं.



आजसुद्धा हे भाग एवढे दुर्गम आहेत. बरेच दिवस रस्तेच बंद असतात. आणि चालू असले तरी कधी खराब होतील, बंद होतील सांगता येत नाही. अशा ठिकाणी येउन हि मंदिरे कोणी बांधली असतील? त्याची माहिती कशी पसरली असेल? कुठल्या ओढीने ह्या ठिकाणी वर्षानुवर्षे भक्त येत असतील?

हिमालयाचं सौंदर्य फारच गूढ आहे. आसक्ती आणि विरक्ती असे दोन्ही परिणाम साधणारे हे अनोखे सौंदर्य. ह्याच्या प्रेमात पडून लोक वारंवारसुद्धा येतात. काही लोक विरक्तीमुळे इथेच येउन राहतात. उगाच नाही तप म्हटले कि हिमालय डोळ्यासमोर उभा राहत.

त्या बर्फानी बाबा सारखे जगाची फिकीर नसणारे आत्म मग्न लोक असेच हिमालयाच्या कडेकपारीत बसत असतील. ऋषी तपासाठी येत असतील. महाभारतातच पांडव विशेषतः अर्जुन तर कितीतरी वेळा हिमालयात येउन गेले. काहीतरी खास जादू आहे ह्या हिमालयात.

महाभारत, हिमालय, आसक्ती, विरक्ती असे अनेक विचार त्या वेळी मनात तरळून गेले, आणि त्या खुणा मनावरही कोरून गेले. 

Wednesday, February 3, 2016

वॅली ऑफ फ्लॉवर्स : ६ : वॅलीमधला दुसरा दिवस

वॅलीमध्ये जातानाच्या रस्त्याचे वर्णन, तिथे घालवलेला आमचा पहिला दिवस याचे वर्णन या मालिकेत आधीच्या लेखामध्ये आलेलेच आहे.

वॅलीमध्ये पहिल्यांदा जाताना आम्हाला उशीर झाला होता. तिथे पोहोचल्यावर पाऊस पडल्याने आम्हाला खूप कमी वेळ वॅली मोकळेपणाने पाहता आली. दुसरा दिवस यासाठीच राखून ठेवला होता. पण त्यादिवशी सुद्धा सकाळी पाउस पडल्यामुळे आम्ही सावधगिरी म्हणून हेमकुंडला गेलो आणि नंतर कडक उन पडून आमची फजिती झाली.

आता आज खरोखरीच शेवटचा दिवस होता. आज पाऊस पडो कि न पडो, धुकं असो वा नसो आम्हाला वॅलीमधेच जाणे भाग होते. कारण त्याच्या दुसऱ्या दिवशी आम्हाला घांगरीयामधून पुन्हा गोविंदघाटकडे निघायचे होते.

आमचे मॅनेजर देवकांत यांनी सांगितलेच होते, कि एकदा वॅलीमध्ये जाऊन आल्यावर सहसा लोक दुसऱ्या दिवशी पुन्हा जाण्यात आळशीपणा करतात, आणि हेमकुंडला जाऊन येउन आराम करतात, किंवा हेमकुंडला जाण्याआधी एक दिवस घांगरीयामधेच जवळपास वेळ घालवतात.

सकाळी आमच्या ग्रुपमधूनसुद्धा थोडी गळती होईल अशी चिन्हे दिसत होती. आदल्या दिवशी हेमकुंडला जाऊन आल्यामुळे सगळ्यांना थोडा थकवा तर आलाच होता. पण शेवटी एकमेकांच्या उत्साहाचा सगळ्यांवर परिणाम झाला आणि सगळेच जण निघाले.

असे म्हणतात कि जे होते ते चांगल्यासाठीच ते खरे वाटावे असा त्या दिवशीचा अनुभव होता. सकाळपासुन थोडं ढगाळ वातावरण होतं. त्यामुळे वॅलीमध्ये पोहचेपर्यंत तिथे फिरून येईपर्यंत धाकधुक चालू होती. पण पाऊस पडला नाही.

मध्ये चढताना काही वेळ उन पडून गेले, थोडासा त्रासही झाला. पण पुन्हा गेले आणि वातावरण जरा सुखद झाले. माझी आणि निखिलची पुन्हा वेगळी गम्मत झाली. आम्ही चढताना थोडे मागेच होतो. काही वेळ मी सगळ्यात मागे होतो. आणि माझ्या थोडं पुढे निखिल. उन्हामुळे त्राण कमी होऊन माझा वेग खूपच मंदावला होता. पण मी आज ठरवलं होतं कि कितीही वेग कमी असला तरी चालत राहायचं. उभ्या उभ्या थांबून लगेच निघायचं. निखिल काल सारखाच पुन्हा पुन्हा थांबत होता. पण मी त्याच्या जवळ पोचलो कि तडक पुढे जात होता. रस्ता चिंचोळा होता म्हणून ओव्हरटेक करता येत नव्हतं. आणि मलाही खूप वेगात पुढे जायचं नव्हतं म्हणुन मी त्याच्या मागेच चालत होतो. पण मला मजा वाटत होती.

थोड्यावेळाने आम्ही एका झऱ्यापाशी पाणी प्यायला थांबलो. बाकी काहीजण पण होते. तिथुन रस्तापण जरा मोठा होता. आणि वॅलीपण जवळ आली होती. मी पाणी पिउन ताजातवाना झालो आणि मग जवळपास न थांबताच पुढे गेलो.

आज ग्रुपमधल्या लोकांमध्ये तसं खूप जास्त अंतर नव्हतं. निखिल जेव्हा पोचला तेव्हा त्याने सांगितलं कि काल जसे आम्ही दोघंच मागे राहिलो होतो, तसं होईल असं त्याला वाटत होतं. पण माझी परिस्थिती कालपेक्षा बरी होती म्हणून मी पुढे गेलो तर तो एकटाच राहिला असता आणि त्याला मग पुढे यायचा उत्साह कमी झाला असता, म्हणून तो मला येऊ देत नव्हता. :D. पण आज उन तुलनेने कमी असल्यामुळे, आणि बाकीचे खूप पुढे नसल्यामुळे काल इतकी वाईट परिस्थिती नाही झाली.

घांगरीया हे छोटेसे गाव आहे. तिकडे फक्त पावसाळ्यात लोक जाऊन दुकाने हॉटेल्स चालवतात. त्यामुळे तिथली क्षमता मर्यादित आहे. म्हणून टूर कंपन्या गट करून साधारण एकाच वेळापत्रकानुसार लोकांना तेथे आणत असाव्यात.

स्वतःच्या योजनेनुसार, किंवा तंबूमध्ये सामानसुमान घेऊन येणाऱ्या गटांबद्दल मी बोलत नाही. किंवा हेमकुंडच्या दिशेने जाणाऱ्या शीख यात्रेकरू यांच्याबद्दलसुद्धा नाही. त्यांना गोविंदघाट, आणि घांगरीया या दोन्ही ठिकाणी अजून गुरुद्वारा आहेत, तिथे आसरा, मदत मिळते.

पण जसा आमचा मुळात आदला दिवस वॅलीसाठी होता तसाच बाकी अनेक जणांचा सुद्धा होता. आम्हाला वॅली पावसाशिवाय पाहण्याची अति हौस असल्यामुळे फक्त आम्ही तो दिवस टाळून हेमकुंडला गेलो. पण बाकी सगळे जण थांबले किंवा वॅलीमध्येच गेले.



त्यामुळे आज फक्त आम्ही वॅलीमध्ये गेलो. बाकी एखाद दुसरे एकटे फिरणारे परदेशी लोक सोडता वॅलीमध्ये कोणीही नव्हते. वॅली आमच्यासाठी राखून ठेवल्यासारखी वाटत होती.

भरपूर भटकलो आम्ही. खूप दूरपर्यंत जाऊन आलो. पहिल्या दिवशी आम्ही घांगरीयापासून साधारण ६ किमीपर्यंत आलो होतो. आज १० किमी आलो. म्हणजे आजची पूर्ण पदयात्रा २० किमीची होती.


पाउस नसल्यामुळे दूरपर्यंत सगळं स्पष्ट दिसत होतं. आधी एवढा स्पष्ट व्ह्यू मिळालाच नव्हता.



भरपूर प्रकारची फुलं असली तरी वॅली नेटवर पाहिलेल्या फोटो सारखी फुलांनी गच्च भरलेली नव्हती. हिमालय मूलतःच इतका सुंदर आहे, त्यामुळे आमच्या समोरची दृश्ये छानच होती.

पण फुलांमुळे थोडा अपेक्षाभंग झाला. गाईडकडून याचं कारण समजलं ते असं. ह्या भागात दर वर्षी पूर्ण बर्फ जमतो आणि तो उन्हाळ्यात वितळल्यावर फुले यायला सुरुवात होते. आणि मग तापमान, पाउस, यावर प्रत्येक फुलाच्या जातीचा एक हंगाम असतो. साधारणपणे जुलै महिन्यात सर्वात जास्त फुलं असतात. त्यामुळे आमची वेळ निश्चितच बरोबर होती. पण या वर्षी बर्फच जरा उशिरा वितळला होता. म्हणुन अजून म्हणावी तितकी फुले नव्हती.

    

आम्ही थोड्या मनातल्या मनात अन थोड्या उघडपणे शिव्या दिल्या. कि हे आधी सांगता येत नव्हतं का? १-२ आठवडे सुट्टी काढुन, दूरचा प्रवास करून आपण इतक्या वर येउन पोहोचल्यावर, जेव्हा थोडा अपेक्षाभंग होतो, तेव्हा त्याचं शास्त्रीय कारण ऐकून काही समाधान होत नाही. त्याच वर्षी १० जणांच्या सुट्या पुढे मागे ढकलणं अवघड आहे. पण आम्ही पुढच्या वर्षी आलो असतो.

मुद्दा असा कि, पुन्हा येणं अशक्य जरी नसलं तरी असे मोठे बेत सहजासहजी होत नाहीत. एवढ्या दूरची जागा एकदा पाहिली असेल तर आपण बेत आखताना दुसऱ्या जागांना साहजिकच जास्त प्राधान्य देतो.

पण ते शेवटी व्यावसायिक लोक. म्हणावी तितकी फुलं आली नाहीत म्हणून घेतलेली आगाऊ रक्कम परत करून आरक्षण त्यांनी स्वतःहून रद्द करणे तर अशक्यच. त्यापेक्षा आम्ही ठरवलेल्या सगळ्या सुविधा आम्ही पुरवतो, गाईड देतो, फिरवून आणतो, फुलं कमी कि जास्त ते आमच्या हातात नाही म्हणून हात वर करणे हेच सोपं आहे.

पण मी म्हटल्याप्रमाणे "थोडा"च अपेक्षाभंग. कारण आम्हाला अनुभवायला मिळालं ते सौंदर्यसुद्धा अप्रतिम. आणि ह्या ट्रीपमध्ये बेत आखताना, जाताना, येताना, फिरताना, सगळ्याच गोष्टीत आम्ही भरपूर आनंद लुटला होता.

   

काही ठिकाणी आनंद तिथल्या वैशिष्ट्यांमुळे येतो, काही ठिकाणी आपल्या सोबत असलेल्या लोकांमुळे. आणि कधी त्या दोन्हींमुळे.



  

प्रेमकथांमध्ये त्या जोडप्याला कुठे तरी दूर दूर जाण्याची इच्छा असते असं दाखवतात. आणि संन्यासी लोकसुद्धा जगापासून वेगळे होण्यासाठी शांत जागी जातात. हि जागा तशीच होती. बाकी जगाचा काहीच संबंध नाही. एकदम शांत. सोबतचे लोक पुढे मागे झाले, किंवा फोटो काढण्यासाठी कुठे रेंगाळलो तर पूर्ण शांतता. आणि आजूबाजूला फक्त सुंदर दृश्य. वेड लावेल इतका सुंदर आहे हिमालय.

जर चाललं असतं तर तिथेच पडून राहून एक रात्र काढायची इच्छा होती. तिथे मावळणारा आणि उगवणारा सूर्य पहायची इच्छा होती. पण काय करणार?


फिरत फिरत, फोटोज काढत, भरपूर पाण्याचे ओढे पार करून आम्ही गाईडच्या मते शेवटच्या टोकाला पोचलो.


गाईडच्या मते यासाठी म्हटलं कि, त्या पुढेसुद्धा वॅली पसरलेलीच आहे. पण तिकडे कोणी जात नाही. तिकडून परत यायला इतका वेळ लागतो कि, आणि तिथे मुक्काम किंवा संध्याकाळपर्यंत फिरलेलं चालत नाही. आणि पुढे जास्त नवीन फुलेही नाहीत, आतापर्यंत पाहिलेलीच फुले इस्ततः विखुरलेली आणि कमी संख्येने दिसतात.



मग आम्ही जर निवांत एका नदीकिनारी बसलो. सोबत आणलेले डबे काढुन जेवलो. चिक्कार सोलो आणि ग्रुप फोटो काढले.



गाईड इथून लवकर परत जायला घाई करत होता. उन कमी होऊन आता पुन्हा ढग यायला लागले होते. जाताना पाऊस पडला तर रस्त्यात लागलेल्या कुठल्याही ओढ्यांचा प्रवाह वाढू शकतो असं त्याला वाटत होतं. आमच्यापैकी काही जण अजून किती पुढे जाता येईल ते बघत होते. त्याला आग्रह करून आम्ही काही जण अजून पुढे एका हिमखंडापर्यंत जाऊन आलो.

थोडासा पाउस पडला तरीही सुदैवाने गाईडला भीती होती तसं काही झालं नाही. आम्ही सावकाश, टाइमपास करत, ती इंद्राची बाग (वॅली) शेवटची डोळ्यात भरून घेत तिथून बाहेर पडलो.

---

ता. क. आज शेवटचा दिवस म्हणून प्राणी पक्षी यापैकी कसले तरी फोटो काढायचेच म्हणून परतीच्या वाटेवर जवळपास अर्धा तास खर्च करून काढलेले फोटो. खूप इकडे तिकडे पळुन हाती लागले फक्त लाल चिमणी



आणि बिन शेपटीचा पहाडी चुहा. (म्हणतात ना, खोदा पहाड, निकला चुहा. :D)