Tuesday, May 5, 2015

सुन्न करणारी झाडाझडती

नुकतीच माझी विश्वास पाटीलांची "झाडाझडती" हि कादंबरी वाचून झाली. आणि मी शीर्षकात लिहिल्याप्रमाणे या कादंबरीने मला सुन्न करून सोडले. जांभळी नावाच्या एका गावात धरण होऊ घातलेलं असतं. ते धरण बनण्याआधी पासून ते धरण बांधुन झाल्यावर कितीतरी वर्षे या धरणग्रस्त गावातल्या लोकांचे किती हाल होतात हे चित्रित करणारी हि कादंबरी आहे.

मुखपृष्ठाचा स्त्रोत
शोकांतिका हा विश्वास पाटील यांचा आवडता कादंबरी प्रकार असावा. पानिपत आणि संभाजी या त्यांच्या ऐतिहासिक कादंबऱ्या असल्या तरी त्यांचा शेवट शोकातच होतो. त्या अर्थाने त्या शोकांतिकाच. झाडाझडती हि तर प्रत्येक अर्थाने शोकांतिकाच आहे. पण त्यातल्या शोकाचा अंत नाही. ती कादंबरी सुरूच शोकात होते, आणि ती ज्या ठिकाणी संपते त्या पुढेही त्या गावकऱ्यांचा शोक सुरूच राहील असे जाणवते.

एक गाव. त्यातले बारा बलुतेदार. जमिनदार. राजकारणी. शेजारची गावे. त्यातले महत्वाचे लोक. सगळ्यांचे आपसातले संबंध. त्यातले जातींचे संदर्भ. गावकऱ्यांचे दैनंदिन आयुष्य. सरकारी कर्मचारी. अधिकारी. मंत्री. सगळ्या प्रकारचे लोक. त्यांचे विचार. त्यांच्या कृती. आणि धरणासारख्या प्रचंड मोठ्या गोष्टीचा असंख्य लोकांच्या आयुष्यावर होणारा तितकाच मोठा परिणाम. हे सगळे बारकावे विश्वास पाटीलांनी इतक्या बारकाईने टिपले आहेत, कि ते गाव आणि तिथले लोक हे आपल्या डोळ्यांसमोर जिवंत होऊन वावरतात.

हा लेख मी ह्या कादंबरीचे परीक्षण करण्याकरता मुळीच लिहिलेला नाही. इतक्या मोठ्या आणि महत्वाच्या विषयाला हात घालून विश्वास पाटील यांनी आपल्या असामान्य प्रतिभेचा वापर करून कागदावर जे काही उतरवले आहे त्याचे परीक्षण करण्याची माझी पात्रता नाही. पण हि कादंबरी वाचताना मी कोणत्या विश्वातून आणि मनस्थितीतून प्रवास करून आलो त्याबद्दल सांगावं वाटलं.

आणि जे लोक मोठी पुस्तके वाचत नाहीत, किंवा असा काहीसा गंभीर विषय असणारे पुस्तक वाचणार नाहीत, अशांना किमान हा लेख वाचून याची माहिती व्हावी असा प्रामाणिक उद्देश आहे.

जांभळी हे एक साधेसे गाव. तिथले बहुतांश लोक अडाणी, भोळेभाबडे. आपला व्यवसाय मात्र नेमका जाणणारे. तिथे आणि आजूबाजूच्या काही छोट्या खेड्यांची जमीन संपादित करून सरकार धरण बांधण्याचा प्रकल्प घोषित करते.

धरणाखाली गाव जाणार म्हणजे आपली जमीन, आपले घर, परिसर, मंदिरे, देव सर्वांना सोडून कुठल्यातरी परमुलुखात आयुष्याची घडी बसवायला जायचे. एक भाड्याचे घर बदलताना किती त्रास होतो विचार करा. मग आपले पिढीजात वाडे, मोठ्या इस्टेटी, गावातला बस्तान बसलेला धंदा सोडून दुसऱ्या ठिकाणी जायचे. कशासाठी? तर धरणासाठी. हे किती अवघड असेल?

या गावातले शिकले सवरलेले खैरमोडे मास्तर याला विरोध सुरु करतात. त्यांनी त्यांच्या नोकरीची सुरुवात दुसऱ्या एका धरणग्रस्त लोकांच्या गावातूनच केलेली असते. अशा धरणग्रस्त लोकांचे प्रश्न कसे वर्षानुवर्षे सुटत नाहीत. त्यांची अक्खी पिढी कशी या धरणामुळे बरबाद होते हे त्यांनी जवळुन पाहिलेले असते. आपल्या गावाचे आणि आपल्या लोकांचे असे होऊ नये यासाठी ते निर्धाराने  विरोध करतात. चळवळ उभी करतात.

धरणामुळे ज्या लोकांचा विकास होणार असतो ते साहजिकच या लोकांकडे विकासाच्या मार्गातले अडथळे या दृष्टीने बघतात. त्यांच्यावर टीका करतात. सरकार गुरुजी आणि त्यांच्या सहकाऱ्यांना तात्पुरते जेलमध्ये बंद करून पोलिसांच्या बंदोबस्तात धरणाचे काम सुरु करते.

धरण तर अटळच असते. हे गुरुजींना आधीपासून माहित असते. त्यांचा मुद्दा असतो तो पुनर्वसनाचा. आधी पुनर्वसन आणि मग धरण असा त्यांचा आग्रह असतो. कारण सरकारचे प्राधान्य धरण बांधण्यास आहे आणि पुनर्वसन लटकत राहणार हे मागच्या किती तरी धरणांच्या बांधणीतून सिद्ध झालेले असते.

त्या जिल्ह्याचे खासदार यात मध्यस्थी करतात. एक भावूक भाषण करून जांभळी गावाच्या लोकांना आपल्या खैरापूर गावात पुनर्वसित करू अशी घोषणा करतात. त्यांचे खैरापूरचे कार्यकर्ते त्यांच्या आवाजात आपला आवाज मिसळून धरणग्रस्त आणि आपण भाऊभाऊ असल्याच्या घोषणा देतात. या धरणाचे पाणी खैरापूरच्या दुष्काळी भागात येणार असते. तिथे उस शेती फुलणार असते. खासदाराच्या मुलाचा साखर कारखाना उभा राहणार असतो. गावात रोजगार येणार असतो.

सरकारी अधिकारी ४०० धरणग्रस्तांना नोकरीत सामावून घेऊ म्हणून घोषणा करतात. या सर्व घोषणा ऐकून जांभळीकर हरखून जातात. धरण तर अटळच असते. त्यांचा विरोध मवाळ होतो. भूसंपादन सुरु होते. सरकारी अधिकारी गावात येउन जमिनी घरदार, झाडे यांची मोजणी करून मुल्यमापन सुरु करतात.

आणि घोटाळ्यांना सुरुवात होते. गावातले राजकारणी लोक सरकारी अधिकाऱ्यांना पैसे चारून आपल्या नसलेल्या जमिनींचे पैसेसुद्धा सरकारकडून वसूल करतात. आणि गावातल्या साधारण शेतकऱ्यांच्या असलेल्या जमिनींचा नीट मोबदला मिळत नाही. मोबदल्यातून कर्जाच्या रकमा वजा होतात, अल्पबचत योजना रेटण्यासाठी शेतकऱ्यांना न विचारता रकमा बचत योजनेत गुंतवल्या जातात. एका शेतकऱ्याला तर त्याच्या वडिलांचे कर्ज कापून, आणि उरलेली रक्कम परस्पर अल्पबचत योजनेसाठी कापून शेवटी फक्त ५० रुपये हातात मिळतात.

गावातल्या जमिनीचं मुल्यांकन, तिचा मोबदला, त्या गावातून नव्या गावात जाण्यासाठीची व्यवस्था, नव्या गावात जमिनी आणि घरासाठीच्या जागांचे वाटप, तिथे घर बांधण्यासाठी मिळणारी मदत, तिथल्या सुविधांची बांधकामे, या सगळ्या गोष्टीत घोटाळे होतात.

आणि हे करणारे सर्व लोक बाहेरचे नसतात त्याच गावातल्या लोकांपैकीसुद्धा काही सामील असतात. आपल्याच गावकरी बंधूंचा केसाने गळा कापून ते आपला फायदा करून घेतात.

नव्या ठिकाणी ज्या चांगल्या जमिनीचा, गावठाणाचा वायदा खासदार आणि त्यांच्या गावातल्या लोकांनी केलेला असतो, भाऊ भाऊ असल्याचा दिलासा दिलेला असतो तो ते सर्व जण विसरतात. धरणग्रस्त लोकांना देण्यासाठी नोंद झालेल्या आपल्या जमिनी काही न काही कारणाने काढून घेतात. कोर्टात सरकार विरुद्ध खटले दाखल करतात. त्यामुळे पुनर्वसन लांबत राहते.

धरणग्रस्तांना निकृष्ट जमिनी मिळतात. गावाबाहेर खराब जागा राहण्यासाठी मिळते. ज्यांच्या त्यागामुळे आपल्या गावात धरणाचं पाणी येणार त्या लोकांना खैरापूरवाले आपल्या गावात आलेल्या भिकाऱ्यासारखी वागणूक देतात. त्यांचा दुस्वास करतात. हरप्रकारे त्रास देतात.

ह्या सर्वाला गुरुजीच्या नेतृत्वाखाली विरोध चालू असतो. त्यामुळे यात सामील असलेले सरकारी अधिकारी, राजकारणी, ठेकेदार सर्व लोक गुरुजी आणि त्यांच्या माणसांवर हल्ले करतात, त्यांना नामोहरम करण्याचा प्रयत्न करतात.

अपवादाने काही अधिकारी त्यांची मदत करण्याचा, असला भ्रष्टाचार करणाऱ्या लोकांना रोखण्याचा, सरकारने धरणग्रस्त लोकांना जाहीर केलेल्या योजना त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतात. पण त्यामुळे हितसंबंध गुंतलेले बरेच लोक दुखावतात आणि अशा लोकांची अल्प काळात बदली होते.

हा लढा देत देत गुरुजी आणि त्यांच्या पिढीचं आयुष्य उतरणीला लागतं तरीही त्यांची आणि त्यांच्या पुढच्या पिढ्यांची झाडाझडती चालूच राहते.

ह्या सर्व घटना इतक्या बारकाईने टिपल्या आहेत कि हे जग काल्पनिक राहतच नाही. आणि मी झाडाझडती लिहितानाच्या प्रवासाबद्दल पाटील यांनी लेख लिहिला आहे तोहि मी वाचला. स्वतः सरकारी अधिकारी म्हणून काम केलेले असल्यामुळे अशा सर्व घटना आणि लोक त्यांनी जवळून पाहिल्या आहेत. पुस्तक लिहितांना अशा अनेक लोकांना भेटून कथासामुग्री गोळा केली आहे. आणि हा अस्सल मसाला इतका अप्रतिम वापरला आहे, कि ती एक कादंबरी नाही तर एका जिवंत जगाचे समालोचन (कमेंटरी) वाटते.

आतापर्यंत धरण, धरणग्रस्तांचे प्रश्न, आंदोलन, मेधा पाटकर यांच्याविषयी वर्तमानपत्रात येणाऱ्या बातम्यातून फारच वरवरची आणि जुजबी माहिती झाली होती. पण हि कादंबरी वाचून हे सगळं खोलवर समजलं, मनाला भिडलं आणि सुन्न करून गेलं.

ह्याच पुस्तकात एक आई मुलाला सांगते त्याप्रमाणे माणूस हि जमातच अत्यंत स्वार्थी आहे. आपण आपल्या स्वार्थासाठी सगळी पृथ्वी, जमिनी, जंगले, खनिजे, पाणी ताब्यात घेतले आहे. बाकी सर्व सजीवांना डावलून आपले वर्चस्व स्थापन केले आहे. पण एक माणूस दुसऱ्या माणसाशी सुद्धा किती वाईट वागू शकतो!

अन्याय करणारे लोक तर स्वार्थी, असंवेदनशील आणि क्रूर असतातच. पण आपणसुद्धा अगदी कोडगे झालेलो आहोत. अशा बातम्या रोज पाहुन वाचून आपण बधिर झालेलो आहोत. अशा गोष्टींची नाममात्र दाखल घेऊन आपण दुर्लक्ष करून आपल्या आयुष्यात गुरफटून जातो. तेही एकवेळ ठीक पण अन्यायाविरोधात लढणाऱ्या मेधा पाटकर, अण्णा हजारे अशा लोकांवर विनोद करण्यापर्यंत आपली मजल जाते.

आमिर खान आंदोलनात सामील होतो तर तो प्रामाणिक आहे कि प्रसिद्धीसाठी आलाय यावर आपण वाद घालतो, पण त्यात आंदोलन बाजूला सारून विसरून जातो. सगळेच नाही पण असे स्वमग्न लोक खूप आहेत.

आपण असे कोशात गेलेलो असताना असं काही समोर आलं कि आपोआप या सगळ्याचा विचार मनात येतो. ती तात्पुरती अवस्था असते. आपण त्यातून बाहेर येतो. पण त्यातून आपल्याला जाणीव होते, जाणीवेत वाढ होते. अशा लोकांप्रती आणि प्रश्नांप्रती आपली संवेदनशीलता वाढते.

त्यातूनही बरेच काही साध्य होते.

अधिकाधिक माणसे संवेदनशील होत गेली तरी बरेच प्रश्न कमी होतील. विचार करा, ह्या कथेतले आणि तसे प्रत्यक्षातले गावकरी, अधिकारी, राजकारणी, नेते सर्व लोक जर संवेदनशील असते, दुःख समजून घेणारे असते, तर हे पुनर्वसनाचे प्रश्न इतके वर्षानुवर्ष लांबत राहिले असते का?

आपल्या संवेदना जगवण्यासाठी, हे जग समजून घेण्यासाठी झाडाझडती जरूर वाचा. हा विषय इतक्या प्रभावी पणे कादंबरीतून मांडणाऱ्या विश्वास पाटलांना माझा सलाम.

No comments:

Post a Comment