Sunday, August 31, 2014

रॅंपेज

"साहेब.. ते माझा रूट बदलायचं बघा की.. किती दिवसांपासून मागे लागलोय तुमच्या. माझी झोप होईना झाली नीट. आता मुलीचं लग्न ठरलंय. लय कामं लागणार माझ्यामागं आता. काहीच सुधरत नाय सध्या.. करा की एवढं काम."

निरकर त्यांच्या कदमसाहेबांना विनवत होता. कदम वैतागले होते.

"बघू म्हटलं नाय का रे तुला.. कशाला माझ्यामागे भुणभुण लावतोय. आता याद्या निघतिल काही दिवसात तेव्हा बघू ना."

"अहो साहेब याद्या आलरेडी ठरल्यात म्हणून कानावर आलं माझ्या. ज्याला हवं ते करून घेतलय सगळ्यांनी. मग माझं पण काम करा ना त्यात."

"कोणी सांगितलं तुला?.. अजुन मलासुद्धा माहीत नाही यादीत कोण आहे कोण नाही.. कुठल्यातरी बाजारगप्पा  ऐकून माझं डोकं नको खाऊ. चल निघ आता. कामं आहेत खूप."

निरकर हिरमोड होऊन निघाला. निरकर एसटीचा ड्राइवर होता. गेले बरेच दिवस त्याला दूरच्या रुटवर नेमलेला होता. आणि अशीच बरेच दिवस त्याची लांब लांब पल्ल्याच्या मार्गावरच नेमणूक होत होती.
म्हणून तो कंटाळलेला होता. अशा सततच्या प्रवासाने त्याला पाठदुखी सुरू झाली होती. महिन्यातला अर्ध्याहून अधिक वेळ त्याचा मुक्काम बाहेरगावी एसटीच्या गलिच्छ स्थानकांमधे असे.

आता मुलं मोठी झाली होती. बापाला ऐकेनाशी झाली होती. आणि ती मोठी कधी झाली ह्याचाही त्याला पत्ता लागला नव्हता. बायको सोशिक आणि शांत होती. पण इतक्या वर्षाच्या धकाधकीच्या संसारात बहुतांश वेळ नवरा दूरच असल्यामुळे ती आता अलिप्त झाली होती.

निरकरला आता थोडा आराम हवा होता. जवळचा कुठला तरी रूट. जेणेकरून त्याला रोज घरी तरी येता येईल. थोडावेळ घरी घालवता येईल. आता मुलीचं लग्न ठरलंय. त्याची कामं उरकता येतील. पण हे काही केल्या जुळून येत नव्हतं. कोणत्या न कोणत्या कारणामुळे त्याच्या रूटची बदली सारखी अडत होती.

लग्नाची कामे तशीच पुढे सरकत होती. मुलाकडच्या लोकांनी थेट हुंडा मागितला नव्हता. पण लग्न कसे झाले पाहिजे, मानपान कसे झाले पाहिजेत हे मात्र बजावून सांगितले होते.

अशी थकवणारी नोकरी सांभाळून हि कामे करताना निरकरचा जीव जिकिरीस आला होता. लग्नात बरीच उसनवारसुद्धा करावी लागली होती. कसंबसं लग्न पार पडलं. पाहुणे गेले. सुटीचे मोजकेच दिवस राहिले होते.
निरकर दुपारचा घरी आराम करत होता. समोर धाकटा मुलगा रवि कम्प्युटरवर गेम खेळत बसला होता. कार बंदुका मारामाऱ्या असा त्याचा टाईमपास चालू होता.

त्याचे बारावीला दोन पेपर राहिले होते. आता पुढच्या खेपेस ते द्यायचे होते म्हणून तो निवांत बसला होता. निरकर विचार करत होता आपलं आयुष्य हे असं चाललय. पोरांना शिकवून काही अपेक्षा ठेवावी म्हटली तर आपले चिरंजीव हे असे. खूप हट्ट करून त्याने हा कम्प्युटर घ्यायला लावला होता. वापरलेलाच घेतला असला तरी निरकरला तो जडच गेला होता. आणि गेम खेळण्यापलीकडे त्याचा काही वापर दिसत नव्हता. विचार करता करता त्याला संताप आला. काही तरी बोलायला म्हणून त्याने हाक मारली.

"ए रव्या"

मुलगा उत्तर देणार तेवढ्यात फोन वाजला. रवीने उठून फोन घेतला. निरकर फोन संपेपर्यंत म्हणून गप बसला. आणि परत विचार करायला लागला. अभ्यासात गती नव्हती पोराला पण तसा वाईट नव्हता. घरात असला कि हसवायचा सगळ्यांना. ताईच्या लग्नात खूप मेहनत केली होती त्याने. निरकरच्या गैरहजेरीत कितीतरी कामे मार्गी लावली होती. वय फार नसलं तरी समज होती. आता ताई गेल्यापासून जरा शांत शांतच होता. आत्ता नको बोलायला. निरकरचा राग निवळत होता. पण अभ्यासाचं काय? जाऊ देत. १२वि होऊ देत. आणखी शिकतो म्हटला तर बघू. नाहीतर देऊ कुठेतरी चिटकवून नोकरीला. असं रडतपडत आपण तरी किती शिकवणार? डोक्यातले विचार शांत होताना निरकरचं मुलाच्या बोलण्याकडे लक्ष गेलं. 

"अरे काही नाही यार. बोर होत होतं. गेम टाकलाय नवा. व्हाईस सिटी. भारीये एकदम. मिशनचं टेन्शन नाय. टॉमी नावाचा हिरो आहे. फॉरेनचा भाई असतो. तो व्हाईस सिटीत येतो आणि छोट्यामोठ्या सुपाऱ्या घेतो. अमक्याची गाडी फोड. बँक लुट असले भारी मिशन असतात. आणि टाईमपास करायला तर एकदम बेष्ट. शहरात फिरायचं मस्त.  गाड्या फिरवायच्या वाटेल त्या. आणि लोकांना उगाच मारायचं. आणि आपलं डोकं सटकलेलं असेल ना तर रॅंपेज घ्यायचं. एका मिनिटात ३० लोकांना मारायचं. पोलिस मिलिटरी सगळ्यांना मारायचं. कत्तल नुसती. सगळा राग निघून जातो त्या लोकांवर."

निरकर ऐकत होता. फोन संपल्यावर रवीने स्वतःच विचारलं.

"काय म्हणत होते पप्पा?"

"अरे एवढा कम्प्युटर घेतला घरात. जर बापाला पण शिकव कि."

"मागे दाखवलं होतं ना. गाणे कसे लावायचे. पिक्चर कसा बघायचा ते."

"ते झालं रे. आता हा गेम कसा खेळायचा शिकव कि."

आज  दिवसाढवळ्या पिउन आले कि काय अशा नजरेने रवीने पप्पांकडे पाहिलं. पण त्यांचं डोकं सटकायला मिनिटभर लागणार नाही हे लक्षात आलं आणि तो मुकाट्याने त्याच्या पप्पांना गेम शिकवायला लागला.

निरकर सगळं शिकत होता. गेम कसा लावायचा. रस्त्यावर कोणाची पण गाडी कशी हिसकावून घ्यायची. गेममधल्या शहरात बंदूक कुठून घ्यायची. मिशन कुठून सुरु होतं. निरकर हळूहळू खेळायला लागला आणि त्याला नवाच चाळा लागला.

त्याला त्या गेममध्ये रॅंपेज विशेष आवडलं होतं. कुठलंही एक हत्यार घ्यायचं, आणि लोकांना मारत सुटायचं. कधीतर नुसती हाणामारी करायची. तर कधी एखादी गाडी घेऊन रस्त्यात सगळ्यांना चिरडून टाकायचं.

हे कदमसाहेब, हा तो हरामखोर कंडक्टर, हि जावयाची खडूस आत्या, हा घरमालक असा सगळ्या जगावरचा राग निरकर त्या गेममध्ये काढायला लागला.

निरकरची बदली झाली. आधीपेक्षा अंतर कमी होतं खरं. पण रस्ता अतिशय खराब. त्याची पाठदुखी काही कमी होईना. पण आता घरी काही वेळ तरी मिळत होता. पण लवकरच तो दूर होता तोच बरा होता असं घरच्यांना वाटायला लागलं .

त्याचं पिणं वाढलं होतं. आणि गेम खेळणंसुद्धा. कार्ट्याने बापाला काय नवीन खूळ लावून दिलं म्हणून निरकरची बायको वैतागायची आणि रविवर भडकायची. नवरातर तिच्याकडे  काही लक्ष देत नव्हता. कधी नव्हे ते जास्त वेळासाठी घरी येऊ लागलेला नवरा असा विचित्र नादी लागलेला पाहून तिचा हिरमोड झाला. काही भानगड वगैरे करत नाही एवढंच नशीब समजून ती गप्प राहायची.

रविपण हैराण झाला होता. आता माझ्यापेक्षा जास्त माझे पप्पाच गेम खेळतात असं तो मित्रांना सांगायचा. त्याच्या मम्मीसारखंच कुठून बुद्धी झाली आणि पप्पांना गेम शिकवला असं त्याला वाटत होतं.

आता निरकर कोपऱ्यावरच्या प्लेस्टेशनमध्ये बॉक्सिंगवाला गेमपण खेळायला लागला. देशी दारूचा अड्डा आणि ते प्लेस्टेशन अशा दोन्ही ठिकाणी त्याची उधारी झाली.

तो पूर्ण जीव लावून बॉक्सिंग खेळायचा. जोरजोराने शिव्या देत गेममधल्या स्पर्धकाला ठोसे मारायचा. हे कोण कुठले काका येउन खेळत बसतात यामुळे तिथली लहान पोरं वैतागली होती. त्यांचं येणं कमी झालं तेव्हा त्याला प्लेस्टेशनचा दरवाजा बंद झाला.

शेवटी रवीने त्याला तसाच एक गेम घरीच कम्प्युटरवर टाकून दिला. निरकर खुश झाला. पोरगा काहीतरी कामाला आला.

हे गेम शिकल्यापासून त्यांचं बोलणंच जवळपास बंद झालं होतं. आधी निरकर दूर असल्यामुळे आणि त्याच्या तापट स्वभावामुळे मुलं त्याला घाबरून दूर पळायची. पण तो आधी त्यांच्यावर ओरडायचा तरी. आता ताईपण लग्न करून गेली. आणि निरकरचा सगळा राग, सगळी निराशा गेममधेच निघायला लागली. ते रागवण्यापुरतं बोलणंपण बंद झालं.

रवीचा निकाल लागला. एक पेपर निघाला पण एक पुन्हा राहिला. निरकर काहीच बोलला नाही. त्या दिवशी मात्र त्याने गेम खेळून रॅंपेजमध्ये शेकडो रस्त्यावरचे लोक, पोलिस, मिलिटरीवाले मारून टाकले.

आता पोरांना धाक होता तो पण नाही. करंट्याने आणखी एक वर्ष वाया घातले आणि बाप असा कम्प्युटरला चिकटलेला हे बघून मात्र बायको प्रचंड संतापली आणि तिचं निरकरशी जोरदार भांडण झालं.

काही दिवस कोणाचंच चित्त थाऱ्यावर नव्हतं. तशातच निरकरने ड्युटीवर असताना एका गावाकडे टपरीवर बस  चढवली. गाववाल्यांनी जमून त्याला मारहाण केली. पुण्यातल्या एका दवाखान्यात त्याला दाखल केलं. एसटीने त्याला सस्पेंड करून टाकलं. चौकशीची टांगती तलवार त्याच्या डोक्यावर लटकावली.

एखाद दोन छोट्यामोठ्या घटना वगळता निरकरच्या कारकिर्दीत हा पहिलाच अपघात होता. पण हल्ली त्याचं पिणं वाढलंय हे सगळ्यांनाच माहित होतं. त्याने पिउन गाडी चालवली असावी असा संशय होता. आणि त्याचं वागणं पण अशात खूप बदललं होतं. अगदी घुम्यासारखा राहत होता तो. डोक्यावर काहीतरी परिणाम झाला असावा असा सगळ्यांचा समज झाला होता.

पैशाची अडचण होतच होती. बायकोने हि संधी साधून कम्प्युटर विकून टाकला. रवीनेसुद्धा थोडासाही विरोध केला नाही. उलट स्वतःच गिऱ्हाईक शोधून आणला. आता तर पप्पा सस्पेंड झालेत. घरी आले कि कम्प्युटर सोडणार नाहीत हि भीती त्यालासुद्धा होती.

कम्प्युटर विकल्याचं निरकरला कळलं आणि नवरा बायकोमध्ये पुन्हा खडाजंगी झाली. पण आता काही इलाज नव्हता. घरी येउन निरकर त्रस्त झाला.

कोणीतरी घरी येउन निरकरला सुचवलं कि कदमसाहेबांना जरा बाहेर जेवायला ने. चिकन खाऊ घाल. थोडी दारू पाज. आणि विनंती कर पुन्हा कामावर घ्या म्हणून.

निरकरला खर्च नको वाटत होता. पण बायकोच्या आग्रहामुळे त्याने कदमसाहेबांना बोलावलं आणि जवळच्या बारमध्ये घेऊन गेला. ती जागा पाहूनच साहेबांनी नाक मुरडलं. पण निरकरच्या विनंतीमुळे आत येउन तरी बसले. त्या बारमध्ये निरकरची आधीचीच उधारी होती. आता तो सस्पेंड झालाय हे त्या मालकालासुद्धा कळलं होतं. आधीची उधारी तर जाऊच दे हा आजचं बिलसुद्धा उधारी करून बुडवणार असं समजून मालकाने हुज्जत घालायला सुरु केली. आधीची उधारी दे आणि मगच आज ऑर्डर घेईन असं तो म्हणायला लागला. यावरून निरकरची आणि त्याची हमरातुमरी झाली. या तमाशामुळे कदम साहेब भडकले आणि काही न खातापिताच निघून गेले.

दुसऱ्या दिवशी निरकर कदमांची माफी मागायला गेला. त्यांनी त्याचा अपमान करून हाकलून लावलं. कालचा तमाशा ते विसरायला तयार नव्हते. चार चौघांसमोर त्यांनी निरकरचा मोठा अपमान केला.

निरकर बाहेर पडला. आणि कोपऱ्यात जाऊन बसला. त्या अपमानामुळे त्याला प्रचंड राग आला होता. पण त्याला काही बोलता आलं नव्हतं. नोकरीचा प्रश्न होता. पण तरी असा अपमान करावा? हा आत्ताचा अपघात सोडला तर त्याच्या कारकिर्दीत ठपका लावावा असं काहीच नव्हतं. देतील त्या रुटवर मुकाट्याने त्याने गाडी चालवली होती. घराबाहेर राहून घर चालवलं होतं. आणि हे सगळं करून मिळालं काय? मुलगी लग्न करून गेली. मुलगा बिनकामाचा. बायकोने बोलणं टाकलं होतं. आणि एक छोटा अपघात झाला. त्या हरामखोर गाववाल्यांनी इतका मारला. ते कमी कि काय म्हणून या लोकांनी सस्पेंड केलं. कधी कोणाला मखलाशी करायला गेलो नाही. पण कधी नाही ते काल त्या भडव्या कदमला दारू पाजायला गेलो तर बारवाल्याने काशी केली. त्याचं भांडण तर माझ्याशी होतं. त्यात या कदमला भडकायला काय झालं? त्याचा राग धरून या माजोरड्याने  आक्ख्या डीपार्टमेंटसमोर इज्जत काढली होती.

निरकर संतापाने लालेलाल झाला होता. त्याचा श्वास एकदम जोरजोराने सुरु झाला होता. समोर एक बस थांबली. ड्रायव्हर खाली उतरून ऑफिसमध्ये एन्ट्री करायला गेला. निरकर अचानक उठला आणि समोरच्या बसमध्ये चढला. ड्रायव्हरने बहुतेक पटकन जाऊन यायचं म्हणून बस सुरूच ठेवली होती.

इतकी वर्षे गांड घासली इथे. एक छोटा अपघात झाला म्हणून सस्पेंड करतात साले. चार चौघात लाज काढतात. थांबा दाखवतो आज ह्यांना. निरकर बेभान झाला होता. त्याने जोरात गाडी वळवली. काही लोक गाडीत चढायला येतच होते ते घाबरून बाजूला झाले आणि थोडक्यात बचावले. निरकरने गेटजवळ एका बसला कट मारून बस स्थानकातून बाहेर काढली. आणि राँग साईडमध्ये घुसवली.

भरपूर प्रवासी बस पकडायला घाईघाईत रस्ता पार करून चालले होते. रिक्षावाले कोपऱ्यावर थांबले होते. गाड्या विरुद्ध दिशेने येत होत्या. सिग्नलसाठी हळूहळू थांबत होत्या. कोणालाहि एसटीची एक बस इतक्या वेगात या बाजूने येईल अशी अपेक्षा नव्हती.

निरकर सगळ्यांना चिरडत उडवत निघाला. बस पकडायची का हरामखोरांनो पकडून दाखवा हि बस. रोजची किटकिट किटकिट साली. इथे थांबवा. तिथे थांबवा. धक्के बसतायत हळू चालवा. पकडा बस भडव्यांनो.

आता लोकांनी आरडाओरडा सुरु केला होता. सगळे लोक त्याला हातवारे करून थांबायला सांगत होते. पण त्याला आता कशाचंच भान नव्हतं. एक ट्राफिक पोलिस दांडा घेऊन हिम्मतीने अडवा आला त्याला चिरडून निरकरने बस तशीच पुढे नेली.

मेन रोडवर गाडी आली आणि गाड्यांना ठोकर देत निघाली. कार जीप कितीही चांगल्या असल्या तरी बससमोर त्यांचा काय टिकाव लागणार?

लोक नुसते ओरडत होते. थांबवा. वाचवा. रोको. गाड्यांच्या धडकीमुळे आणि राँग साईडमध्ये घुसल्यामुळे निरकरची बस थोडी मंदावत होती. तेवढ्यात एक धडक बसलेल्या कारचा ड्रायव्हर ओरडला "अबे पागल हो गया क्या भोसडीके?" आणि निरकर पुन्हा पेटला.

पूर्ण जोर लावून त्याने पुन्हा बस पुढे नेली. जवळच्या पोलिस चौकीतले पोलिस रस्त्यावर आले होते. त्यांनी गाड्या मध्ये घातल्या. गाडीवर गोळ्या झाडल्या पण काही उपयोग झाला नाही. एका पोलिस वॅनने बसला जोरात धडक दिली. आणि गाडी थोडी जागीच थांबली.  त्याचा फायदा घेऊन एक मुलगा जीवावर उदार होऊन बसमध्ये घुसला.

निरकरशी त्याची झटापट झाली. मारामारीत शेवटी निरकर त्याच्यापुढे कमजोर ठरला. आणि शेवटी ते काही मिनिटांचेच भयंकर मृत्युचे तांडव थांबले.

निरकरला मारत त्या मुलाने बाहेर काढले. निरकरने बसच्या मागे पाहिले. किती गाड्या उडवल्या. किती माणसे चिरडली काही हिशोब नव्हता. समोरचे दृश्य अगदी व्हाईस सिटी गेममधल्यासारखे दिसत होते. पोलिसांनी निरकरला मारत मारत आत घेतले.

दिवसभर टीव्हीवर तीच न्यूज झळकत होती. निरकरच्या घरी हे कळलं तेव्हा ते अगदी हवालदिल झाले. रवि पोलिस चौकीत पप्पांना भेटायला गेला तेव्हा ते एवढंच म्हणाले.

"रव्या, लय भारी रॅंपेज केलं आज. बस घेऊन धिंगाणा घातला फुल रस्त्यावर."

Monday, August 25, 2014

Happiness is

Among all trending things on social media, I like one particular trend. To define happiness. We see a lot of posts, images, trying to define what happiness is. A lot of people started posting in the same fashion, when they were happy.

"Happiness is meeting your old friends after a lot of years."

"Happiness is returning to your hometown, and tasting mom's special dishes."

"Happiness is hanging around with your favorite lot, and lose the count of hours."

These people are trying to express what happiness means for them. And that's why I like this trend. When it is easy to name reasons for anger, sorrow and boredom, this trend made people think of reasons of happiness, things which make them happy.


Image Source : homejelly.com
Suddenly, we find so many reasons to be happy. You may be sad about something, and you see someone happy just because he is eating at home, or because he met his old friend, or because he watched a movie of his favorite film star. You may realize that you also have the thing which others are feeling happy about. You may start to feel happy for some time.

I did a basic course (YES+) in Art Of Living, when I was in college. One thing I learnt there (out of many good things) had a huge impact on me. The mentor of that course, Dinesh Bhaiya, asked everyone, "when will you be happy?"

Participants answered with their reasons for happiness. Somebody said he will happy when he will complete his graduation, and somebody said when he will get a job, somebody wanted a bike and so on. 

Then the mentor pointed out, nobody answered that I am happy now. Everybody was waiting for something to happen to be happy. Does that mean you are sad now? Can't you be happy before those things happen? Is your happiness solely dependent on that thing? It was an awakening question.

When we say I will feel happy when this X thing happens, we actually postpone our happiness till that thing happens. Some things take less time, some things like graduation, or even graduation of your children will take years to happen. Shouldn't we feel happy throughout the course?

Then he started explaining. Happiness is a feeling. You can feel happy now. You must stop waiting for something to happen. You should free your happiness of any condition, any target. Even though you'll fail, you will have heart breaks, people will hurt you, still you will have some or the other reason to be happy. 

It does not mean you stop having aims. You must have them, and work hard to achieve them. But don't make your happiness depend on it. Feel happy now. When you achieve what you want, you'll feel happier. But irrespective of your achievements, feel happy, spread happiness. 

When somebody asks you how are you? Don't give a formal "I am good", or a dull reply. Say "Super Fantastic", "Fabulous". When you feel happy, you should make others smile with you.

After doing that course, for some days I also used to reply "Super Fantastic". But later, I automatically returned to routine answers. But this happiness thing has lingered in my mind since then. It has made a great change in the way I feel and take things. For me, happiness is NOW.

Friday, August 22, 2014

डागाळलेला चंद्र

आत्ता अशातच पोर्णिमा होऊन गेली. त्याधीपासून आणि त्यानंतरही काही दिवस चंद्र खूपच सुंदर दिसत होता. आणि सुदैवाने मला जवळपास रोज त्याचं दर्शन झालं. आणि विशेष म्हणजे त्याच्या सर्व डागांसह तो खूप सुंदर वाटत होता.

लहानपणापासून चंद्र म्हणजे सुंदर, सौंदर्याची एक उच्च उपमा म्हणजे चंद्रासम सौंदर्य, असं आपल्या डोक्यात कायमचं कोरलं गेलंय. अनेक कवितांमधून, फिल्मी गाण्यांमधून, ललित लेखांमधून, आणि आणखी कशा कशातून. दर कोजागिरीला आपण त्याची पूजासुद्धा करतो.  

लहानपणी चंद्रावरचे डाग सश्यासारखे दिसतात म्हणून चंद्रदेवाच्या मांडीवर ससा बसलेला असतो अशी कथासुद्धा मी ऐकली होती. पुराणात चंद्राच्या डागांची सुद्धा एक कथा आहे. चंद्राने उंदरावरून जाणाऱ्या गणपतीची खिल्ली उडवली म्हणून गणपतीने त्याला पूर्ण निस्तेज होण्याचा शाप दिला. पश्चातापदग्ध चंद्राने क्षमा मागितल्यानंतर मग गणपतीने त्याला शापातून मुक्त केलं, पण काही डाग तसेच राहिले, ह्या धड्याची आठवण राहावी म्हणून. 

कळायला लागल्यावर डाग असलेल्या चंद्राला इतकं सुंदर म्हणून का चढवून ठेवलंय असा प्रश्न पडतो. नितळ चेहऱ्याच्या एखाद्या लावण्यावातीची तुलना अशा डागाळलेल्या चंद्राशी केली तर काहीसं आश्चर्यच वाटतं. पण डाग असुनही एखादी गोष्ट सुंदर वाटू शकते हे कळायला अजून बरीच समज यावी लागते. 

चंद्राला निरखून पाहताना मनात चंद्र आणि आयुष्य याचा एकत्रित विचार सुरु झाला. आणि जाणवलं कि आपण चंद्रासारखेच आहोत. लहान असतो तेव्हा सुरक्षित वातावरणात, घराच्या आवारात आपला वावर असतो. बरचसं आयुष्य आपल्या आई-बाबांच्या सावली मध्ये जातं. पण त्यातून बाहेर पडून स्वतः प्रकाशमान व्हायचा प्रयत्न करतो, तेव्हा आपल्या प्रकाशाइतकेच आपले डाग सुद्धा जगासमोर येतात. 

अगदी निरभ्र असं आयुष्य कोणाला जगता आलंय? गुण अवगुण, आणि सुख दुःख अशा दोन्ही आलेखांवर आपला आयुष्य आणि व्यक्तिमत्व दोन्हीकडे झुकलेलं असतंच. अगदी सामान्यांपासून असामान्यांपर्यंत सर्वांनी गुणांमुळे, कर्तृत्वामुळे यश आणि लोकांचं प्रेम मिळवलं, तितकंच अवगुणांमुळे, नशिबामुळे दुःख आणि रोषसुद्धा पत्करला. "जगी सर्व सुखी असा कोण आहे?" हा प्रश्न समर्थांना सुद्धा पडला. आणि सुर्यावरही डाग आहेतच, पण तो दूर असल्यामुळे आणि अत्यंत तेजस्वी असल्यामुळे ते दिसत नाहीत एवढंच. 

पण डाग असले तरीही प्रकाश देता येतो, हे चंद्रच आपल्याला शिकवतो. चंद्राचा प्रकाश स्वतःचा नसतो, परावर्तीत असतो, तसंच आपलंसुद्धा नाही का? आपणसुद्धा अनेक गोष्टींसाठी अनेक लोकांवर अवलंबून असतो. ती लोक आपली कामे पार पाडतात म्हणूनच आपण आपला कार्यभाग साधू शकतो. 

आपल्याकडे काही महत्वाचे सण जसे कि राखी पोर्णिमा, गुरु पोर्णिमा, कोजागिरी पोर्णिमा असे पौर्णिमेलाच ठेवले आहेत. या प्रत्येक दिवशी चंद्र वेगवेगळ्या तर्हेने अतिशय सुंदर दिसतो. त्या सणांच्या मूळ उद्देशा इतकाच चंद्राचे सौंदर्य साजरे करणे हा सुद्धा एक सुप्त हेतू नसेल कशावरून?

चंद्रासारखे आपण कलेकलेने वाढत जातो, मोठ्यांच्या सावलीमधून बाहेर पडता पडता आयुष्याची पोर्णिमा गाठतो. आणि पुन्हा कलेकलेने कमी होत आकाशातून गायब होऊन जातो. पण चंद्र पहायची सवय असलेल्यांना त्या जागी अमावास्येलासुद्धा गोल पोकळी दिसत राहते. 

सौंदर्य-दृष्टी आली तर चंद्र त्याच्या सर्व डागांसह सुंदर वाटतो. नजरेतच सर्व काही आहे. ती नजर असलेले लोकच डागाळलेल्या चंद्राला आणि कुठे न कुठे उण्या पडणाऱ्या आयुष्यालासुद्धा सुंदर म्हणू शकतात.

Wednesday, August 13, 2014

रघु देसाई

रघु देसाईचं आतापर्यंतचं आयुष्य एकदम छान गेलं. फक्त सध्याच्या फेजबद्दल तो थोडा नाखूष होता. रघु देसाई काही महिन्यापूर्वीच जुनी कंपनी सोडून आमच्या कंपनीत जॉईन झाला होता. त्याने त्या कंपनीमध्ये खूप मजा केली होती. तिथलं वातावरण त्याला आवडत होतं, त्या कंपनीकडून तो ऑनसाईटपण जाऊन आलेला होता. त्याला आमच्या कंपनीमधलं वातावरण फारसं पसंत पडलं नव्हतं. त्याच्या मते आधीचीच कंपनी छान होती.

"वहापे बहोत ऐश करते थे रे... अपने बाप कि जान्गीर थी जैसे, यहापे साला दिन रात मराओ, फिर भी काम खतमहि नही होता. सबको गधेजैसे काम करनेकि आदत है यहा, टाईमपे घर निकलो, तो ऐसे देखते है कि सामनेसे आठवा अजूबा जा रहा है." अशी त्याची कुरकुर चालायची.

एकदम गप्पिष्ट माणूस होता तो. त्याच्या बे-मध्ये बऱ्याचदा गप्पांचे अड्डे जमलेले असायचे. आजूबाजूच्या दिल्लीकडच्या, पंजाबी वगैरे पोरांसोबत गप्पा मारताना तो तिकडे असतानाच्या आठवणी काढायचा. तिकडचे किस्से सांगायचा. तिकडे वातावरण किती मस्त असतं, तिकडचे लोक किती बिनधास्त असतात. तिथे त्याच्या ऑफिसजवळच तो राहायचा, आणि तिथे आजूबाजूला खाण्यापिण्याच्या गोष्टींची कशी रेलचेल असायची वगैरे गोष्टी सांगत रमायचा.  मुंबईला शिव्या द्यायचा. जाण्यायेण्यात इतका वेळ जातो म्हणून वैतागायचा. त्याच्या  आधीचंच शहर जास्त चांगलं होतं. 

त्याने तिकडे बॅंचलर लाइफ़ एन्जॉय केली होती. आता लग्न झाल्यावर कशी वाट लागते हे सांगायचा, अजून अविवाहित असलेल्या मुलांना "ऐश करा लेको, हेच दिवस आहेत" अशा आशयाचे डोस पाजत राहायचा. त्याचे तसले दिवस सरल्याची खंत त्याच्या चेहऱ्यावर उघड दिसत असे. आणि ती त्याच्या बोलण्यामधूनही लपत नसे. त्याच्या मते आधीचंच आयुष्य छान होतं.

त्याचं एकदा कुठल्यातरी मित्राशी फोनवर बोलणं चालू होतं. लवकरच कुठला तरी लाँग विकेंड येणार होता. तो मित्र सुटीवर मूळ गावी चालला होता. तो यालापण चलायला सांगत असावा. हा त्याला हताश सुरात म्हणत होता "तुमचं काय साहेब.. असेल तर ट्रेनमध्ये बुकिंगच्या बर्थवर नाहीतर बिनधास्त खाली पेपर टाकून जाताल गावाला. आम्ही आता फॅमिलीवाले. बुकिंग मस्ट झालंय. असं जाऊ शकत नाही. आणि एकट्याने जायचा विषय जरी काढला तरी बायको जीव घेईल."

तो एकटा असताना सुटीच्या दिवशी दुसरं काही नसेल तर ऑफिसला येऊन नेटवर टाईमपास करत असे, पण आता कामासाठी विकेंडला ऑफिसला यावं लागलं तरी त्याची बायको कुरकुर करायची, आणि मग तो चिडून यायचा. कधी उशिरा थांबावं लागलं आणि बायकोचा फोन आला कि वेडावाकडा चेहरा करून फोन वर बोलायचा, आणि आम्हाला हसवायचा. त्याची आधीची एकट्याची लाइफ सही होती, असं त्याला मनापसून वाटतं.


एव्हाना आमच्या प्रोजेक्टची डेवलपमेंट संपून टेस्टिंग सुरु झालं होतं. टेस्टर लोक सगळे एपीआय (सॉफ्टवेअरचा एक भाग) टेस्ट करून त्यातले बग्स, इश्युज रेज करायचे. ते आम्हा डेवलपर लोकांना सोडवण्यासाठी असाईन व्हायचे. रघुने बरेच मोठे एपीआय डेवलप केले असल्यामुळे त्याला बरेच इश्युज यायचे, आणि तो वैतागायचा. दिवसभर टेस्टर लोकांना लाखोली वाहत इश्यू सोडवत बसायचा.



त्या एपीआयमध्ये मला कळायला लागल्यावर मलाही इश्यू मिळायला लागले. मग तो गमतीने म्हणायचा "यार तूहि लेले न सारे इश्युज, इतना अच्छा जावाका (जावा : प्रोग्राम लिहिण्याची भाषा) चँप है.. मै  टेस्ट लीड को बोल देता हु, अभी इसके आगे मेरे एपीआयमे कुछ इश्यू आता है, तो सिधा तेरेकोही देनेको.. मेरेको झंझटहि नही चाहिये" हे याला त्याला चँप म्हणून काम करून घेण्याची त्याची खास स्टाइल होती.

कोणालाही काम सांगताना त्या व्यक्तीला कितपत ज्ञान आणि अनुभव आहे याचा विचार न करता अगदी बारीकसारीक सूचना द्यायचा. "काम सुरु करताना कोड लेटेस्ट घे" "किवर्डस कैपिटलमध्ये टाक" इ. समोरच्याच्या अकलेचा असं सन्मान करण्याचं त्याचं कारण "बाद मे लफडा नही चाहिये" असं असायचं. 

रघुला शिकवण्याची आवड उपजतच. त्यामुळे संधी मिळेल तिथे प्रत्येकाला निःशुल्क शिकवण्याचं अखंड व्रत त्याने घेतले आहे. टीममधले सहकारी, टेस्टर लोक, बॉस कोणालाही त्यांचे काम आणखी चांगले कसे करता येईल, त्यांना प्रगतीस कुठे वाव आहे, हे तो अगदी उत्साहाने शिकवत असतो. यामुळे तो कंपनीसाठी एक अमूल्य असेट आहे. :D 

त्याचं स्वतःचं काम किती व्यवस्थित आहे हे दाखवण्याचा त्याला छंदच आहे. कुठल्याही चर्चेत, "मेरे सिस्टमपे तो मैने ऐसा सब कर के रखा है.." "मै ना इसको ऐसे ऐसे करता हु, तो क्या है ना टाईम बच जाता है" अशी वाक्य तो येता जाता कोणावरही फेकतो.

ब्लेम गेम मध्ये तर तो एक कसलेला पटू आहे. सरकारी खात्यात, जिथे फक्त इकडून तिकडे काम टोलवणे हे मुख्य कौशल्य लागतं, तिथे त्याने टोलवाटोलवीची महान कामगिरी करून दाखवली असती. आयटी कंपनीमधेही काही कमी होत नाही हे सर्व. पण टोलवण्याआधी थोडे तरी काम करावं लागतंच.

रघुकडे काही असं काम आलं कि रघु ताबडतोब त्याचा फडशा पाडून, चेंडू दुसरीकडे टोलवून देई. आणि दुसरीकडून काही विलंब झाला कि याचा ठणाणा सुरु. बॉसशी काही बोलायला जावं आणि तो जागेवर नसेल, किंवा त्याने मेलला लवकर उत्तर दिले नाही तर त्यालाही सुनवायला मागे पुढे पाहत नाही. मग बाकीच्या पामरांची काय कथा.

रघूच्या लेखी काम देणारा म्हणजे शत्रू.. त्यामुळे त्याला काम देणाऱ्याला रिकामं न राहू देणं हे त्याचं कर्तव्य असल्यागत तो वागे. प्रत्येक छोट्या बाबतीत वरून मंजुरी आल्याशिवाय स्वतः पुढे जात नसे. म्हणजे कामाला उशीर झाला तर तो बॉसने शंकेचं लवकर समाधान केलं नाही म्हणून, आणि कामात चूक झाली तर विचारूनच केलं होतं अशी बोंब ठोकायला तो मोकळा.

काही दिवसांनी काही एफएस, डीएस ( थोडक्यात क्लायेंटच्या गरजा, अपेक्षा आणि त्या पूर्ण करण्यासाठी डेवलपरला सूचना असलेले कागदपत्र  ) मध्ये चुका ध्यानात आल्या, त्या बदलण्याचं काम होतंच, त्यात परत क्लायेंटने बऱ्याच गरजा बदलून आमचं आणखी काम वाढवलं.

तेव्हा रघु आयुष्यालाच वैतागला होता. "क्या कामा करते रे ये लोग, दस बार डीएस चेंज करेंगे, और दस बार हमे उसकेलीये बैठना होगा दस घंटे, साला एक बार बैठो ना जी भरके क्लायेंटके साथ, ठीक से एकही ढंग का डीएस बनाओ, हम भी एकही बार कुछ घंटे मे बना देंगे उसको.. ये क्या रोज कि मगजमारी, रोज कुछ चेंज करो, रोज उसको टेस्ट करो, इश्युज निकालो तबतक नया चेंज आ जाता है..."

असाच रडतपडत तो प्रोजेक्ट संपला. नंतरच्या प्रोजेक्टमध्ये रघु दुसऱ्या टीममध्ये गेला होता. त्याच्या अनुभवामुळे त्याला आता काही डीएस बनवायचं काम दिलं होतं. मी सहज त्याला भेटायला गेलो तेव्हासुद्धा  तो वैतागलेलाच होता.

" साला क्या टीम है यार, पकाते है बहोत. डीएस बनानेको दिया है मुझे.. हर रिव्यू मे कुछ न कुछ मिल जाता है इनको.. पक गया मै. कोई और बनाये तो अच्छा है यार. बस पढनेका और प्रोग्राम बनानेका. ये फालतू काम है एकदम. अपना पेहलेका काम अच्छा था यार, मजा आता था करनेमे, टीम भी अच्छा था.. ये क्या......"

रघु देसाईचं आतापर्यंतचं आयुष्य एकदम छान गेलं. फक्त सध्याच्या फेजबद्दल तो थोडा नाखूष आहे.

Saturday, August 9, 2014

जकार्ताच्या आठवणी : ९ : परत मातृभूमीला

शनिवारी आम्ही बांडुंगला जाउन आलो आणि रविवार मी खरेदी आणि सामान बांधणीसाठी राखून ठेवला होता. दुसऱ्याच दिवशी म्हणजे सोमवारी माझं परतीचं विमान होतं. मी घरातली मंडळी आणि मित्रांसाठी काही भेटवस्तू आणि स्मृतीचिन्हे घेतली. कारण हि माझी पहिलीच विदेश यात्रा होती. 

भारतात आता चित्र झपाट्याने बदलत असलं तरीसुद्धा विदेश यात्रा हि अजूनही विशेष गोष्ट समजली जाते. माझे बाबा मागे एकदा कामानिमित्त जपानला गेले होते, आणि त्याची खूप हवा झाली होती. सगळ्यांनी शुभेच्छा द्यायला फोन केले. ज्या लोकांना हे जाऊन आल्यावर समजलं ते आधी का नाही सांगितलं  म्हणून नाराज झाले होते. 

मी आयटीमध्ये काम करतो त्यामुळे मी कधी न कधी ऑनसाईट जाणार हे तर आम्हाला माहीतच होतं. पण म्हणतात त्याप्रमाणे पहिली ट्रीप हि सगळ्यांसाठीच खास असते. आणि माझ्यासाठी सुद्धा खास आहे. हा खूपच छान अनुभव होता. माझ्या ऑफिसमधले असे लोक ज्यांना आता याचं काही अप्रूप राहिलेलं नाही, त्यांनासुद्धा माझा उत्साह पाहून लक्षात येत होतं कि हि माझी पहिलीच वेळ आहे. 

मी कामाच्या बाबतीत बरंच काही शिकलो. नव्या जागा पाहिल्या. तिथे भरपूर मजा केली. मी एक महिना एकटाच राहत होतो म्हणून स्वतःलाच स्वयंपाक करून घ्यावा लागायचा. त्यामुळे माझा स्वयंपाक सुधरला. 

तंत्रज्ञानामुळे आता गोष्टी खूपच सोप्या झाल्या आहेत. गुगलने एकहाती कित्येक उपयोगी सॉफ्टवेअर बनवले आहेत. गुगलचे नकाशे जगात कुठेही जायला मदत करतात. गुगलची भाषांतर सेवा बऱ्याच भाषांमध्ये उपलब्ध आहे. एखाद्या भाषेचा पॅक लोड करून घेतला तर इंटरनेट नसताना पण हि सुविधा वापरता येते. त्यात व्याकरणातल्या चुका होत असतीलहि, पण कामचलाऊ वाक्ये तर नक्कीच बनवता येतात. हि सुविधा मला तिथल्या टॅक्सीवाल्यांशी बोलताना खूप उपयोगी पडली. 

आणि गुगलच्या प्राथमिक सर्चच्या सुविधेबद्दल नव्याने काय बोलावं? या कशाहीबद्दलची माहिती मिळवण्याच्या शक्तीने सर्व जगात एक क्रांतीच झाली आहे. मला खरच आधीच्या काळातल्या लोकांनी ज्यांनी या कुठल्याही सुविधा न वापरता जगात प्रवास केला असेल, त्याचं आश्चर्यच वाटतं. ज्या लोकांनी हि तंत्रे बनवली, आणि ज्या लोकांनी या तंत्रांशिवाय यश मिळवलं अशा दोन्ही प्रकारच्या लोकांना माझा सलाम. 

खूप सिनेमे पाहण्याचा पण एक वेगळाच फायदा आहे. विमानतळ, तिथले सुरक्षेसाठीचे चेक्स, बाहेरच्या देशातल्या गोष्टी या पुन्हापुन्हा पाहून आपल्याला नकळत त्याबद्दल ओळख होत जाते. एरवी सगळं काही प्रथमच पाहताना जो गोंधळ उडतो तो कमी होतो. 

मी पुन्हा क्वालालम्पुरमार्गेच परत आलो. माझी क्वालालाम्पुरहून मुंबईला जाणारे विमान एक तास उशिरा निघाले. तिथे वाट पाहताना खूप कंटाळा आला. विमान हवेत गेल्यावरसुद्धा हवामानामुळे खूप त्रास झाला. सगळ्यांनाच हरवलेल्या MH ३७० विमानाची घटना आठवत होती. आम्हाला निघायलाच आणि रस्त्यात हवामानामुळे बराच उशीर झाल्यामुळे मुंबई विमानतळावर पोहोचण्याची वेळ चुकली होती. बाकीच्या विमानांना पुढे जाण्याची संधी मिळाली होती. मग त्यामुळे आम्ही थोडावेळ मुंबईमधेच आकाशात घिरट्या घालत होतो. मी मुंबईमधल्या जागा ओळखण्याचा प्रयत्न करत होतो. 

मुंबई अशा प्रकारे पाहण्याचा अनुभव छान होता. भरपूर वेळ हवेत घालवून शेवटी आमचं विमान मुंबईमध्ये उतरलं आणि मी माझ्या मातृभूमीत परतलो. :)

Friday, August 8, 2014

जकार्ताच्या आठवणी : ८ : बांडुंगचा ज्वालामुखी

माझी इंडोनेशियाची ट्रीप जवळजवळ संपत आली होती. सोमवारी माझं परतीचं विमान होतं आणि भटकंती करायला शेवटचा विकेंड हातात होता. आम्ही बांडुंगचा ज्वालामुखी पाहायला जायचं ठरवलं. हि जागा जकार्तापासून साधारण दीडशे किमी लांब आहे. 

पहिल्यांदाच मला कोणी सोबत मिळवण्यासाठी काही अडचण नाही आली. आणि नेमकी इतकी चांगली गोष्ट माझ्या शेवटच्याच विकेंड ट्रीपमध्ये झाली. :D माझ्या तिकडच्या टीममध्ये दोन नवीन लोक भारतातून आले होते. आशिष आणि अंकिता. ते बांडुंगला यायला लगेच तयार झाले. आणि मागच्या आठवड्यात तमन सफारीला सोबत आलेली मीनाक्षीसुद्धा तयार होती. असे आम्ही ४ जण झालो. 

या ट्रीपमध्ये आम्ही पाहिलेल्या जागा आणि तिथवर प्रवास असं सगळंच आम्ही एन्जॉय केलं. आमचा यावेळीचा ड्रायव्हर गेबे हासुद्धा प्रसन्न स्वभावाचा होता. त्याने आधी टेपवर काही इंडोनेशियन गाणी लावली होती. मला अशी कुठलीही गाणी ऐकायलासुद्धा आवडतं पण लवकरच गाडीतले बाकीचे कंटाळले. मग आम्ही आपल्या मोबाईलवरच आवडती भारतीय गाणी वाजवायला लागलो. गेबेने आम्हाला त्याचं आवडतं भारतीय गाणं वाजवण्याची विनंती केली. इंडोनेशियामध्ये आणखी दुसरं कोणतं गाणं असणार? ते अर्थातच "कुछ कुछ होता है" चं शीर्षकगीत होतं. 

ते तसं बऱ्यापैकी जुनं गाणं आहे. पण तरी सुदैवाने आमच्यातल्या एकाच्या मोबाईलवर हे गाणं सापडलं आणि आम्ही त्याची फर्माईश पूर्ण करू शकलो. तो ते गाणं ऐकून खुश झाला आणि त्यासोबत गुणगुणूसुद्धा लागला. त्याने आणखी काही गाणे सांगायचा प्रयत्न केला, पण ती गाणी त्याच्या इंडोनेशियन लहेजामुळे आम्हाला समजलीच नाहीत. 

एकदा ती भारतीय गाणी वाजायला लागली कि आम्हालासुद्धा गाणे म्हणायला फार वेळ लागला नाही. आणि लगेच आम्ही भारतीयांचा आवडता गेम "अंताक्षरी" खेळायला लागलो. या सर्वामुळे आपण परदेशी इंडोनेशियात फिरत आहोत असं मुळी वाटतच नव्हतं. पहिल्यांदाच तिथे फिरताना इतकी मजा येत होती. 

आम्ही थोडावेळ गाणी म्हणत होतो, अंताक्षरी खेळत होतो, तर कधी पुन्हा काही गाणी मोबाईलवर वाजवत होतो. गेबेलासुद्धा हे सगळं ऐकून मजा येत होती. तो एखाद्या गाण्यातली वारंवार म्हटली जाणारी मुख्य ओळ ओळखून ती गुणगुणायला लागायचा. त्याचं गाणं ऐकणंसुद्धा मजेदार होतं. 

आम्ही जसे भारतीय संगीतात हरवून गेलो होतो, तसेच तिथल्या रस्त्यांवरसुद्धा हरवलो होतो. आम्हाला जायचं असलेली जागा आणि गेबेने समजलेली जागा वेगळ्या होत्या, आणि त्या गोंधळात आम्ही चुकीचे वळण घेऊन भलतीकडेच गेलो होतो. शेवटी कळलं कि त्या जागा एकच होत्या पण नावे दोन होती. एकमेकांची भाषा येत नसताना संभाषण साधताना अशा काही गडबडी होऊन जातात. 


या गोंधळात अर्धाएक तास खर्ची घालून शेवटी आम्ही पहिल्या ठिकाणी पोहोचलो. या ठिकाणी ज्वालामुखीची जागा, तिथले डोंगर, आणि तयार झालेले एक रासायनिक तळे असा नजारा उंचावरून पाहण्याची सोय केलेली होती. आणि ते दृश्य खूपच अनोखं होतं. विचित्र राखाडी रंगाचे खडकाळ डोंगर, तशाच रंगाचं विचित्र रसायन भरलेलं सरोवर, बऱ्याच ठिकाणाहून निघणारा धूर आणि सगळीकडे पसरलेला रासायनिक दुर्गंध. त्या दुर्गंधामुळे मला केमिकल लॅबचीच आठवण आली. 

हा आपण चित्रपटात पाहतो तसला ज्वालामुखी नव्हता. आणि अर्थात तशा ठिकाणी सुरक्षिततेची हमी नसल्यामुळे सामान्य माणसाला सोडणार पण नाहीत. इथला ज्वालामुखी तीसेक वर्षांपूर्वी फुटला होता असं मी ऐकलं. 

या डोंगरांवर चढाईला पण जाता येतं. काही लोक आम्हाला उंचावर जाताना दिसत होते. पण आमच्याकडे फार वेळ नसल्यामुळे आम्ही तितके दूर गेलो नाही. तिथून पुढच्या ठिकाणी निघालो. 


ह्या जागीमात्र बरंच आतवर जाउन तिथले डोंगर, गरम पाण्याचे डबके/झरे, असं बरंच काही बघता येतं. त्या जागी पोचण्यासाठी गाडी दूर बाहेरच लावून पायीच वीस-तीस मिनिट जंगलातून चालत जावं लागतं. तिथला एक स्थानिक गाईड नेमावा लागतो. आम्ही पण एका गाईडला सोबत घेतला, पण त्याला माहिती सांगण्यापेक्षा त्याच हिंदीचं ज्ञान दाखवण्याचीच जास्त हौस होती. आणि आमच्याकडून आणखी हिंदी शिकण्याचासुद्धा तो प्रयत्न करत होता. 



तिथे जंगलातून चालत जाताना खूप उंच वृक्ष पाहायला मिळाले. गाईडने आम्हाला एक ३०० वर्षे जुना भव्य वृक्ष दाखवला. त्या पायवाटेवरून चालत जाताना खूपच छान वाटत होतं. मला आपण पावसाळ्यात ट्रेक्स करायला जातो त्याचीच आठवण आली. आणि या मोसमात ट्रेकची छोटेखानी सुरुवात इंडोनेशियामध्ये झाली याचा आनंद झाला. 






इथे गरम पाण्याचे बरेच कुंड तर काही ठिकाणी डबकी होती. प्रत्येकाचे तापमान वेगळे होते. काही इतके गरम होते कि, तिथले लोक तिथे अंडे उकडून देतात. आणि ज्वालामुखीमध्ये उकडलेले अंडे अर्थातच साध्या अंड्यापेक्षा खूप महाग असतात. :D पण तरी आम्ही हौसेखातर तसे अंडे घेऊन खाल्ले. 





काही डबके थोडे कोमट होते, तिथे आम्ही पाय बुडवून थोडावेळ निवांत बसलो. तिथल्या गाईडनुसार इथल्या सल्फरयुक्त मातीमध्ये काही औषधी गुण आहेत. त्या मातीने काही लोक पर्यटकांना मसाज करून देत होते. आणि हि माती मुलतानी मातीसारखी त्वचेसाठी पण गुणकारी असल्याचे ते सांगत होते. तिथे एका मुलीने तशी लावून ठेवली होती. ते पाहून आमच्यासोबत असलेल्या मुलींना पण तसं करून पाहण्याचा मोह झाला होता. पण आम्ही चिडवू कि काय अशा भीतीने त्यांनी तो आवरला, आणि त्याऐवजी ती माती एका बाटलीत विकत घेतली. 


तिथल्या स्टॉलवर लाकडात कलाकुसर करून बनवलेल्या वस्तू होत्या. आम्ही तशा काही वस्तू आणि खेळणी विकत घेतली. खरेदी करून आम्ही परत निघालो. रस्त्यात मध्ये थांबून जेवण करून घेतले. येताना आम्हाला खूप ट्राफिक लागली. परत हॉटेलवर पोहचायला खूप उशीर झाला. दिवस खूप छान गेला होता. तो ज्वालामुखी जरी अपेक्षेपेक्षा वेगळा निघाला असला तरी एकदा पाहण्यासारखा नक्कीच होता. आणि यावेळी प्रवास तर खूपच मजेदार झाला होता. :)